हिमांशू
सिटिझन्सपेक्षा नेटिझन्सची संख्या अधिक असण्याच्या आजच्या काळात आपल्याला आपलं प्रत्येक काम संगणकावर सोपवायची भलतीच घाई झाली आहे. आपल्या हातात मोबाइल नसताना असंख्य टेलिफोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते. पण आता स्वतःचा नंबर सांगतानाही बिचकायला होतं. संख्या लक्षात ठेवण्याची आपली क्षमता म्हणजेच न्युमरिक मेमरी मोबाइलच्या तंत्रज्ञानानं गिळून टाकली. रस्त्यावरच्या चळवळीही ऑनलाइन झाल्या आणि शत्रुराष्ट्रावर थेट हल्ला करण्याऐवजी सायबर हल्ला करणं अधिक सोयीचं वाटू लागलं. कारण एकदा “डेटा’ गिळून टाकला, की शत्रू विकलांग होईल, याची खात्री वाढली.
असं असलं तरी तंत्रज्ञानाविषयी जरा सांभाळूनच बोलावं लागतं. तंत्राच्या आहारी गेलेली माणसं मोबाइलमध्ये खुपसलेलं डोकं क्षणभर बाहेर काढून आपल्याला “जुनाट’ म्हणतात आणि आपलं स्पष्टीकरण ऐकण्याआधीच पुन्हा मोबाइलमध्ये मेंदू खुपसतात. एवढं करून संबंधितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला, असं खात्रीनं सांगणं जरा कठीणच! तंत्रज्ञान आपलं अवलंबित्व वाढवत चाललंय आणि क्षमता कमी करत चाललंय, याकडे लक्ष वेधण्याचीसुद्धा चोरी झालीय. कारण संबंधितांना जेव्हा इतर कोणतंही सक्षम कारण सापडत नाही, तेव्हा “अपरिहार्य’ हा शब्द ऐकावा लागतो.
“संगणकीकरण’ या शब्दाचा अर्थही आपण “आपल्या डोक्यावरचं ओझं संगणकावर लादणं’ एवढाच घेतला आणि आता आपल्याला डोकं चालवायची गरज नाही, यावर शिक्कामोर्तब केलं. परिणामी, यंत्राचा माणूस आणि माणसाचं यंत्र झालं.
आपल्याला ज्या-ज्या गोष्टींचा कंटाळा आला, ते काम आपण तंत्रज्ञानावर सोपवू लागलो. उदाहरणार्थ, भाषांतर हे अत्यंत किचकट काम. भाषांतराला नाकं मुरडणाऱ्यांच्या दिमतीला “गूगल ट्रान्सलेटर’ हजरही झाला. परंतु आपल्यात आणि यंत्रात काही मूलभूत फरक आहे, हे न पाहता काही ठिकाणी सरसकट त्याचा वापर झाला आणि परिणामही दिसू लागले. मुंबईच्या रेल्वे पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर मध्यंतरी सूचनांचे फलक लावले गेले, ते असेच यांत्रिक भाषांतराद्वारे तयार केले होते आणि ती मराठी वाचून हसावं की रडावं, कळेनासं झालं होतं.
सध्या असाच एक किस्सा जबरदस्त गाजतोय. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या नावाची इंग्रजी यादी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी तातडीनं मागवली गेली. सगळ्यांची नावं इंग्रजीत कोण टाइप करत बसणार? मग अधिकाऱ्यांनी ती नावं गूगल ट्रान्सलेटरच्या स्वाधीन केली. परिणाम व्हायचा तोच झाला. “शरद’ हे नाव दिल्लीत पोहोचेपर्यंत “स्प्रिंग’ झालं आणि “छाया’ हे नाव “शॅडो’ म्हणून दिल्लीदरबारी पोहोचलं. अडनावांमध्ये “सुतार’चं भाषांतर “कार्पेन्टर’ असं झालं तर “कोष्टी’ अडनावाचं “स्पायडरमॅन’ असं इंग्रजीकरण झालं. शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला होता; पण या घोळामुळं दुसरा हप्ता मिळालाच नाही.
“उत्तम’ नावाचा शेतकरी जेव्हा “बेस्ट’ ठरला, तेव्हा त्यालाही स्वतःचा क्षणभर अभिमान वाटला असेल. परंतु लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत “भगवान’ हेही नाव होतं आणि त्याचं भाषांतर जेव्हा “लॉर्ड’ असं केलं गेलं तेव्हा मात्र भगवंताला शरण जाण्यावाचून शेतकऱ्यांपुढे पर्यायच उरला नाही. भाषांतराचा “उत्तम’ मार्ग शोधून काढणारे अधिकारीच शेतकऱ्यांचे “भगवान’; त्यामुळं नावं दुरुस्त करण्यासाठी रांगेत उभं राहणं, हातापाया पडणं आणि “बेस्ट’च “उत्तम’ आहे हे पटवून
देणं अपरिहार्य!