खटाव – शेतकरी आणि बैल यांच्या नात्याच्या विण घट्ट करणारा सण म्हणजे बेंदूर. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिकतेने शेती व्यवसायात केलेल्या अतिक्रमणामुळे शेतकरी आणि बैलांच्या नात्यात एकप्रकारे दरी निर्माण झाली आणि गावागावांत बैलांची संख्या झपाट्याने घटली. मात्र, या बेंदूर या सणाचे महत्त्व कमी झालेले नाही. सोमवारी खटाव, ता. खटावमध्ये अल्पसंख्य बैल आणि अधिक संख्येने ट्रॅक्टरची बेंदरानिमित्त भव्य मिरवणूक काढून बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला.
कायमच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या खटाव तालुक्यात यंदाही काही वेगळी परिस्थिती नाही. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी माण-खटाव तालुक्यात थोडकाच पाऊस झाला आहे. या पावसावरच येथील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. हिंदू सणांमधील मूळचा सण म्हणून बेंदूर या सणाची ओळख आहे. सोमवारी बेंदरानिमित्त खटाव गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची चांगली खांदमळणी करुन त्यांना अगदी अभ्यंगस्नान घातले. तसेच बैलांची संख्या कमी होऊन त्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे गावातील आधुनिक शेतकऱ्यांनी बैल नसल्याने ट्रॅक्टरही धुवून घेत त्याची सजावट केली. दुपारच्या वेळी अल्पसंख्य बैल आणि बहुसंख्य ट्रॅक्टर अशी ढोल, ताशांचा गजर आणि बेंजोच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनीही मिरवणुकीसमोर नाचण्याचा आनंद घेतला. मोठ्या उत्साहात मूळचा समजला जाणारा बेंदराचा सण पार पडला.