साताऱ्यातील बैठकीत गोरेंना पराभूत करण्याचा निर्धार
अपक्ष लढण्याचे आव्हानहीनारळ फोडायला मुख्यमंत्री
रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर यांनीदेखील आ. गोरेंवर टीका केली. ते म्हणाले, “कॉंग्रेसच्या काळात आ. गोरेंचे तत्कालिन मुख्यमंत्र्यांशी सलोख्याचे संबंध होते. त्यावेळी माण- खटाव तालुक्यात तमाशाचा नारळ फोडायला मुख्यमंत्री यायचे. त्यावेळी कायमचा पाणी प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली नाही.’ मात्र, आज महायुतीचे सरकार आल्यानंतर जेव्हा जिहे- कठापूर आणि टेंभूसाठी निधी येताना दिसत असल्यामुळेच गोरे जवळीक साधू पाहत आहेत, असा आरोप वीरकर यांनी केला.
सातारा – माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत गोरेंचा पराभव करण्याचा निर्धार केला आहे. गोरेंचे सर्व विरोधक एकत्र आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला असला तरी गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांची याबाबतची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत एकत्रित येऊन शड्डू ठोकलेल्या नेत्यांची एकी टिकविण्याचे आव्हान या नेत्यांपुढे आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष या पक्षांचे नेते एकत्रित आले. सातारा येथे त्यांनी बैठक घेऊन गोरेंच्या विरोधात एकजूट दाखवली. जयकुमार गोरे कॉंग्रेसचे आमदार आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा त्यांनी उघडपणे प्रचार केला होता. त्यामुळे श्री. गोरे यांची भाजपची जवळीक वाढली आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चांगला संपर्क ठेवत पाणीप्रश्नासह काही महत्त्वाची कामे मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जयकुमार गोरे यांच्या हलाचालींमुळे माण विधानसभा मतदारसंघातील माण व खटाव या दोन्ही तालुक्यांतील भाजपचे पदाधिकारी अस्वस्थ आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर विशेषतः विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही श्री. गोरे जहरी टीका सध्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकत्र आले. उमेदवारीसाठी माण मतदारसंघात युतीमधील जागावाटपात राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा आहे. त्यामुळे गोरेंच्या विरोधात लढण्यासाठी रासपही प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच भाजपकडे न जाता गोरेंनी अपक्ष म्हणून लढण्याचे आव्हान हे एकत्रित आलेल्या नेत्यांच्या बैठकीत देण्यात आले आहे.
गोरे यांच्याविरोधात इतर सर्वच नेते एकवटल्याने माणमधील राजकारणाची रंगत वाढली आहे. मात्र, या सर्व नेत्यांपैकी प्रत्येकालाच निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याने पुढील काळात ही एकी टिकविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. या सर्वांमधून गोरे यांच्या विरोधात एकच उमेदवार देता आला तरच या नेत्यांच्या एकत्रित येण्याने गोरे यांना शह देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. परंतु, प्रत्येकाचे पक्ष वेगळे व पक्षीय भूमिका त्यावेळी कशी असणार, यावर पुढची सारी गणिते अवलंबून आहेत.
माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी मोट बांधली असून दहा वर्षांत काडीचे काम न करणाऱ्या आमदारांनी भाजपशी जवळीक न साधता अपक्ष लढण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिले आहे. आ. गोरेंना भाजपमध्ये घेण्यास सुरुवातीला माणमधून अनिल देसाई आणि खटावमधून माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जाहीर विरोध केला. त्यानंतर सोमवारी दि. 15 रोजी माण- खटाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.
विशेष बाब म्हणजे, बैठकीला राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. संदीप पोळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, माजी सदस्य रणजितसिंह देशमुख आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई व रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत आ. गोरेंचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी केला. यावेळी डॉ. येळगावकर म्हणाले, “”आ. गोरेंनी दहा वर्षांत काडीचेही काम केले नाही.
माझ्या आमदारकीच्या काळात उरमोडीचे पाणी आले होते. तर आ. गोरेंनी आमदारकीच्या कालावधीत उरमोडीशिवाय दुसरे नाव घेतले नाही. कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असताला जिहे- कठापूर योजना बंद राहिली. त्यासाठी गोरेंनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्याचबरोबर दहा वर्षात टेंभू योजनेचे साधे नावदेखील त्यांनी घेतले नाही. मात्र, आता सरकार जिहे-कठापूर आणि टेंभूसाठी निधी देत असताना केवळ श्रेय लाटण्याची धडपड गोरेंची सुरू आहे. वास्तविक गोरेंचे राजकीय अस्तित्व आता संपले आहे.
जिल्हा परिषदेला त्यांचा केवळ सदस्य निवडून आला आहे. त्यामुळेच ते आता भाजपचा आसरा घेवू पाहत आहेत. मात्र, आमचा गोरेंच्या प्रवृत्तीला ठाम विरोध आहे.” आमची भूमिका मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचविली आहे. ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे येळगावकर यांनी सांगितले. माढ्याचे खासदार निंबाळकर हे गोरेंशी जवळीक साधत आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, खासदारांना निवडून आणण्यामध्ये आमचा मोलाचा वाटा राहिला आहे. ते मिळालेल्या मताधिक्यावरून स्पष्ट होत आहे, असे डॉ. येळगावकर यांनी स्पष्ट केले.