महिला आणि बालकल्याण समितीची प्रस्तावाला मंजुरी
पुणे – खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात शालेय विद्यार्थी कमी पाणी पितात, पाणी कमी प्यायल्याने शालेय विद्यार्थ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते ते टाळण्यासाठी केरळ राज्याच्या धर्तीवर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तसेच खाजगी शाळांमध्ये सुद्धा ठराविक काळानंतर मुलांना आणि शिक्षकांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी वॉटर बेल वाजवण्याच्या प्रस्तावाला महिला आणि बालकल्याण समितीने मंजुरी दिली.
समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रस्ताव दाखल केला होता. यानुसार आता सर्व शाळांमध्ये वॉटर बेल वाजविली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच सर्वांनीच पुरेशा प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे; मात्र कमी पाणी पिण्याची सवय शालेय विद्यार्थ्यांमध्ये जास्त असल्याने आता या ठरावामुळे ती समस्या दूर होण्याला मदत होईल.