Latha Rajinikanth – तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत हे कायमच चर्चेत असतात. मात्र आता अशी एक बातमी आहे की त्यामुळे रजनीकांत नव्हे, तर त्यांच्या पत्नी लता चर्चेच्या झोतात आल्या आहेत. कोचादाईयां या तमिळ चित्रपटाशी संबंधित एका फसवणूक प्रकरणात बंगळुरू येथील न्यायालयाने लता यांना जामीन मंजूर केल्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, लता यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. केवळ सेलिब्रिटी असल्याची किंमत आपल्याला चुकवावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या दृष्टीने एका लोकप्रिय व्यक्तीचा अपमान आणि शोषणाचा हा प्रकार आहे. ही ती किंमत आहे जी आम्हाला सेलिब्रिटी म्हणून मोजावी लागते.
त्यामुळे घटना फसवणुकीची भलेही नसली तरी ती मोठी होऊन जाते. कोणाचीही कोणतीही फसवणूक झालेली नाही, केवळ आमची प्रतिमा खराब करण्यासाठी रचला गेलेला हा एक कट आहे आणि आता या प्रकरणातून मी बाहेर पडले आहे अशी प्रतिक्रिया लता रजनीकांत यांनी दिली आहे.
चेन्नई येथील एड ब्यूरो ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडने ही फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. चित्रपटाच्या अधिकाराशी संबंधित २०१४ मधील हे प्रकरण आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या मीडिया वन यांना आपण १० कोटी रूपये दिले होते असा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात लता रजनीकांत यांनी गॅरेंटर म्हणून सही केली होती असेही तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.
लता रजनीकांत यांच्या म्हणण्यानुसार ज्या पैशांच्या देवाणघेवाणीची चर्चा होते आहे त्याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. हा मीडिया वन आणि संबंधित लोकांमधील व्यवहार आहे. त्यांच्यात अगोदरच तडजोड झाली आहे आणि हा सगळा विषय त्या दोघांमधील आहे. संबंधितांनी पैसे दिले आहेत ना याची गॅरेंटर म्हणून मी दक्षता घेतली आहे. आता हे सगळे झाल्यावर मला फसवण्याचा प्रकार केला जातो आहे.