Vijay Wadettiwar : मागील काही दिवसांपासून पेपरफुटीची अनेक प्रकरणे समोर आली. नुकतेच राज्यात झालेल्या तलाठी पेपरफुटीच्या प्रकरणावरून मोठा वाद सुरू झाला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. उत्तर पत्रिका मिळवून दहा लाखात तलाठी व्हा, असे आमिष उमेदवारांना दाखवले जात असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट
विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये लिहिले की, “राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी तसेच सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात याव्यात ही मागणी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे.”
राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी तसेच सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात याव्यात ही मागणी मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे… pic.twitter.com/3pRw6OZ1Fq
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 11, 2024
“पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी,” असे वडेट्टीवार म्हणाले.
पुढे त्यांनी म्हंटले, “पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे पुढे आले आहे. दहा लाखात तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे. परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी 3 लाख रूपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत. तरीही सरकार गंभीर नाही,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.