मुंबई – 2019साली आम्ही शिवसेना-भाजप युती म्हणून जनतेसमोर आलो. त्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून मत दिली. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत स्वार्थी आणि लालची भावनेने युती तोडून सरकार स्थापन केले. 2019 ला झालेली चूक सुधारायची होती. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. मला मुख्यमंत्री देखील व्हायचे नव्हते. परंतु, 2019 ची चूक सुधारण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि मी मुख्यमंत्री झालो, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा रोडमॅप कसा असणार याबाबत सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, आज आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. परंतु, आरोप कोणीही करेल. 40 आमदार आणि 12 खासदार आमच्यासोबत का आले याचा त्यांनी विचार केला पाहिजे.
आमचे पक्षप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांची पायामल्ली करत असल्याने आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. या पक्षात माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत. कोण काय विचारते यावर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आगामी काळात राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्याच्या सुविधा, शिक्षण या सारख्या सुविधा नागरिकांना दिल्या तर राज्याचा विकास होईल. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. समृद्धी महामार्गासारखे मोठे रोड आम्ही तयार करत आहोत. दळणवळणाच्या सुविधा राज्यात वाढवत आहोत. राज्यात पाच हजार किलोमीटरचे महामार्ग तयार करत आहोत. यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असे त्यांनी सांगितले.
फेसबुकवरून राज्याचा विकास होत नसतो –
महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्य वेगाने प्रगती करत आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. राज्यात अनेक प्रकल्प नव्याने सुरू केले आहेत. केंद्र सरकारसोबत हातात हात घालून काम करत आहोत. त्यासाठी घरातून बाहेर पडले पाहिजे. घरातून फेसबुकवरून संवाद साधून विकास होत नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.