स्त्री मुक्त व्हावी, स्वतंत्र व्हावी या आशयाचे वाक्य ज्या अर्थी आजही कानी पडतात, त्या अर्थी एक गोष्ट स्पष्ट होते की, “ती’ आजही बंधनात आहे. पुरूषाने आपली ताकद व त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेली कमावण्याच्या क्षमतेच्या जोरावर सुरुवातीच्या काळापासून स्त्रीवर जो ताबा मिळवला तो आजपावेतो अबाधित आहे. “त्या’चे स्वतः बद्दलचे संबोधन म्हणजे पती, यजमान, स्वामी, धनी… बघितल्यावर हे सहज लक्षात येते, या साऱ्या शब्दांचा अर्थ काय तर तो म्हणजे मालक. मालक असल्याच्या या अधिकाराचा त्याने इतका अनिर्बंद्ध वापर केला की सतीप्रथेच्या नावाखाली स्त्रीला जिवंत जाळून टाकण्यासही त्याने मागेपुढे पाहिले नाही. स्त्री जातीला त्याचे सारे जुलूम स्वीकारण्याखेरीज पर्यायही शिल्लक ठेवला नाही.
इतकं होऊनही स्त्री आपल्या ठायी असलेले करुणा, दया, प्रेम, रुजुता, ममता, सेवा या प्राकृतिक गुणांना जपत, कसे का होईना? पण पुरुषांबरोबर निभावत राहिली. मनाविरुद्ध घडत असलं, अवहेलना होत असली, निकृष्ट वागणूक मिळत असली तरी “ती’ तग धरून राहिली. घर सांभाळणे, मुलांची निगा राखणे, नाती जोपासणे, जेवण खाणं इत्यादी जबाबदाऱ्या अतिशय कसोशीने पार पाडत राहिली; पण कमावणाऱ्या पुरुषाला तिच्या त्यागाचं, सोशीकपण्याचं महत्त्व कधीच कळाले नाही. उलट ती आपल्या कह्यात कशी राहील याकडे लक्ष दिलं. यासाठी तिला शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात आले होते.
एकूण काय तर व्यवहारवाद, चातुर्य, कावेबाजपणा, बळ इत्यादींचा वापर करत पुरुष कायमच वरचढ राहिला. त्याने नेहमीच स्वतःचे आधिपत्य ठेवले; पण म्हणतात ना, वेळ सारखी राहत नाही. व्यवस्थेने आपली कूस बदलली आणि स्त्री भानावर येऊ लागली. स्त्रीला तिच्या हक्कांची जाणीव होऊ लागली आणि तिने आवाज उठवणे सुरू केले. मागील काही काळात तिला यात बऱ्यापैकी यशही मिळू लागले; पण या यशात, एक चुकीचा समज तिच्या मनात घर करून गेला, तो म्हणजे समाजात उच्चस्थानी येण्यासाठी आपण पुरुषांसारखे व्हायला हवे असे ती मानू लागली, आणि इथून सामाजिक संतुलन विस्कळीत होऊ लागले.
आपले अस्तित्व व्यापक करण्याऐवजी ती पुरुषांशी बरोबरी करण्यासाठी धडपडू लागली. तिचा कल पुरुषाच्या बांध्याला शोभेल अशा कामांकडे वळू लागला; पण निसर्गाने त्या अनुषंगाने तिला बांधलेली नाही हे तिने लक्षात घेतले नाही. आज एखादी स्त्री धोकादायक वाटणारे काम करताना दिसते तेव्हा तिचे कौतुक केले जाते; पण अशा कामाने तिच्यातील कठोरपणा वाढीस लागतो, असे शरीरशास्त्र सांगते.
पुढे ही जर पुरुषांसारखे राकट कामं करण्यास तत्पर राहिली तर तिच्यातील स्त्रीपणा संपुष्टात येण्याची भीती आहे. अशा कामाने तिच्या मनात आक्रमणाची भावना रुजू लागेल, मग ती चांगली पत्नी, कदाचित आई होण्यासही नकार देईल. या साऱ्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात? याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. पुरुष करू शकतो, तर मी का नाही या भावनेने पछाडलेली स्त्री, आज पुरुष होण्याच्या मार्गावर पुढं पुढं चालली आहे; पण याने तिच्यातील सौम्यता हरवेल, प्रेम आटू लागेल. जे समाज स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे.
तिच्याठायी असलेली रुजूता, संयम, संवेदनशीलता हे तिचे बलस्थान असल्याचा तिला विसर पडू लागला आहे. खरं तर ती कोमल आहे. ती पीडा सोसू शकते पण भार उचलू शकत नाही. अर्थात, तिच्या स्वतंत्र होण्याबाबत आक्षेप असण्याचे कारण नाही. सबलीकरणाला कुठे विरोधही नाही. तिने काम करावं, पैसे कमवावे मात्र तिच्या मुळात असलेली सौम्यता, ममत्व… तिचं स्त्रीपण टिकून राहील, याकडेही आजच्या स्त्रीने लक्ष देण्याची गरज आहे. कारण तिच्यावरच, तिच्या संस्कारावरच, तिच्या ममत्वावरच पुढची पिढी अवलंबून आहे. तिच्या मुळेच पुढची पिढी घडवली जाते. तिच्यामुळेच पुढच्या पिढीचा उद्धार होतो.
स्त्री पुरुषांमधील फरक या अर्थाने संपवू पाहणे कितपत योग्य आहे. ती स्वतःचे वेगळेपण गमावत चालली आहे. हा प्रवास असाच सुरू राहिला तर समाज व्यवस्था, समाज संतुलन विस्कळीत होण्याची शक्यता वाढीस लागेल. किंबहुना त्याचे दुष्परिणाम जाणवूही लागले आहेत; कारण आजच्या अनेक तरुणी आता गृहिणी होण्यास टाळाटाळ करू लागल्या आहेत. तिच्या या निर्णयामुळे भारतीय कुटुंब व्यवस्थेसमोर कधी नव्हे अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. गृहिणीपदाकडे ती करत असलेल्या दुर्लक्षामुळे समाजाची प्रचंड हानी होत आहे. त्याचे तीव्र व भयंकर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत; पण असे होण्यासही पुरुष वर्गच जबाबदार आहे, कारण एकूण कुटुंब व पर्यायाने समाज घडविण्यात स्त्रीने केलेले अथक प्रयत्न, तिचे त्याग व योगदानाबद्दलचे श्रेय देण्याचे औदार्य पुरुष वर्गाने कधीच दाखवले नाही. तिला या कामासाठी कधीच सन्मानित केले गेले नाही. पुरुष वर्गाने तिच्या या कामाची महती समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
खरं तर ती कुटुंबाच्या केंद्रस्थानी राहिली तरच संस्कारक्षम पिढीचे निर्माण शक्य आहे. कुटुंब व्यवस्था टिकविण्यासाठी तिने निभावलेल्या भूमिकेचा पुरेपूर आदर तिला मिळायलाच हवा. तसे झाले तरच नात्यातील संतुलन आणि जगाचे सौंदर्य टिकून राहील. यासाठी स्त्री समाजाची मनधरणी करावी लागली तरी बेहत्तर.
ओशो म्हणत, एक प्रसन्न चेहऱ्याची स्त्री ज्या घरात आहे, जिच्या ओठांवर प्रेमाचे गीत आहे, जिच्या चालण्यात लय आहे, जिच्या हृदयी त्याग आहे, जिच्या डोळ्यात वात्सल्य आहे… अशी स्त्री ज्या घरात आहे, त्या घरातूनच चांगली सभ्यता उदयास येऊ शकेल आणि जगही अव्याहतपणे चालत राहील.
महिलादिन विशेष
सत्येंद्र राठी