नवी मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये अनेक बदल झाले असून वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, यातच आता हवामानात बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण राज्यात पुन्हा कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. होळी अगोदरच नवी मुंबई, मुंबई, कोकणात उन्हाचा चटका बसता असण्यास सुरुवात झाली. मागच्या वर्षीपासून देशात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून आता उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
पुढील 48 तास उष्णतेची लाट मुंबईसह संपूर्ण कोकण प्रांतात कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारसह शनिवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईसह पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील तापमानात वाढ होणार आहे असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 39 अंश एवढा नोंदवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस झाला आहे. पालघर इथे गुरुवार दुपारी कमाल तापमान 41 अंश नोंदवले गेले. यामुळे उन्हाचा पारा वाढून नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, हवामानातील उष्णता वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यामध्ये आरोग्याची आणि आहाराची काळजी घ्या. वेळीवेळी पाणी प्या, शरीराला थंड करणाऱ्य़ा भाज्या आणि फळं खा. जेवणाच्या वेळा पाळा आणि शरीराला त्रास होईल असं काहीही खाऊ नका असा सल्लादेखील देण्यात आला आहे.