सातारा – करोना संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून बाहेर जिल्ह्यातून विशेषत: मुंबई व पुण्यामधून सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याबाबत ग्रामस्तरीय समितीने करावयाच्या उपाययोजना व उचित निर्णय घेण्यासाठी ग्रामस्तरीय समिती गठीत करुन सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यात आणखी उपायोजना करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत ग्रामस्तरीय समितीच्या अध्यक्षांना कळविले आहे. मे महिन्यामधील करोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा अभ्यास केला असता बऱ्याच व्यक्ती करोना आजाराच्या अंतिम टप्प्यात हॉस्पिटलकडे येतात. त्यापैकी काही व्यक्तींचा स्वत:चे घर ते हॉस्पिटल या प्रवासात मृत्यू झाला किंवा काही जणांचा हॉस्पिटलला आल्यानंतर तात्काळ मृत्यू झाला. याचा अर्थ नागरिकांनी करोना लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांना भेटून उपचार करुन घेतलेले नाहीत. बाहेरुन गावात येणारी व्यक्ती ही आपल्या गावातील नागरिक आहे.
आपल्यापैकी कोणाची ना कोणाची तरी ती व्यक्ती भाऊ, बहिण, चुलता, चलुती, आई, वडील अशा जवळच्या नात्यातील आहे. बाहेरुन आल्यानंतर सामाजिक दडपणामुळे या व्यक्ती स्वत:चा आजार सांगत नाहीत. त्यामुळे ती व्यक्ती करोना आजारात अंतिम टप्प्याकडे जाते. सर्व ग्रामस्तरीय समित्यांनी आपल्या गावात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला बांधव आहे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या आरोग्याची गावपातळीवर माहिती घ्यावी. कोणत्याही व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना पाठवून आवश्यक उपचार करुन घ्यावा. आपल्या गावातील एकही व्यक्ती करोनामुळे मृत पावणार नाही याची दक्षता व काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.