सागर येवले
पुणे – करोनामुळे वैद्यकीय व्यवसायावर केवळ ताण वाढला आहे असे नव्हे तर त्यांच्यातील माणुसकीचा झरा आटला असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. मृत्यूच्या दारातील रुग्णावर उपचारात चालढकल तर केलीच जाते पण त्याचबरोबर अहवालाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे, असे प्रसंग नेहमीच घडत आहेत. त्यामुळे पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रावर कधी नव्हे ते लांच्छन लागण्याची वेळ आली आहे.
करोनाच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट करणे, आलेल्या प्रत्येकाची करोना तपासणी करणे, मात्र त्याचा रिपोर्ट न देणे, रुग्णाच्या परिस्थितीविषयी (पान 1 वरून) नातेवाईकांना कल्पना न देणे आणि रुग्ण अत्यावस्थ झाल्यावर “तुम्ही पेशंटला ससून रुग्णालयात घेऊन जा’ असा सल्ला देण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचे आढळून येत आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत आलेला अनुभव क्रमानुसार प्रभातला सांगितला. हा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. करोनायोध्दे म्हणात आज डॉक्टर, परिचारिकांना सर्व देश देवांचा दर्जा देतआहे. मात्र, याच काळात काही या क्षेत्रातील अपप्रवृत्ती डोके वर काढत असल्याची धक्कादायक बाबही ठळकपणे समोर येत आहे.
अत्यवस्थ रुग्णांना या प्रकारात जीव गमवाव लागण्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, दु:खात असल्याने त्याबातची वाच्यता होत नसल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. याच्या काही तक्रारी पोलिस ठाण्यात नोंद असून त्यांचा नेहमी प्रमाणे तपास चालू आहे. पुणेकरांना होणाऱ्या या त्रासाचा मागोवा दैनिक प्रभातने विशेष प्रतिनिधी पाठवून घेतला. त्यावेळी त्यातील वेगळेच वास्तव समोर आले. हताशपणे डॉक्टर तुम्ही सुध्दा… असे म्हणावे लागले.
लॉकडाऊन सुरू करण्यापूर्वी घरात राहून उपचार सुरू ठेवाव्या लागणाऱ्या रुग्णांना आता उपचारासाठी दवाखान्याची वाट धरावी लागतआहे. विशेषत: किडणी, मधुमेह, रक्तदाब आणि दम्याच्या रुग्णांना करोनाच्या काळात विशेष त्रास सहन करावा लागत आहे. नेहमीच्या रुग्णालयातही त्या रुग्णांवर उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात पाठवून दिले जात आहे. त्यामूले त्रास सहन करत घरात मरायचे की रुग्णालयात हेलपाटे मारून मरायचे यापैकी एक पर्याय निवडावा लागतआहे. आम्ही दुसरा निवडलाय, असे एका रुग्णाने नाव न छापण्याच्या अटीवर हताशपणे सांगितले.
त्रासाची पहिली फेरी…
वडिलांना मूळव्याधचा त्रास सुरू झाल्यामुळे सातारा रोडवरील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. त्यावेळी त्यांची खासगी लॅबकडून करोना चाचणी केली तर एक्सरेही काढण्यात आला. “एक्सरे क्लिअर आहे आणि करोना अहवालही निगेटीव्ह आहे असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, काहीवेळाने पुन्हा तुमचा पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, त्यांना ससून किंवा नायडूला घेऊन जावा असे सांगितले. त्यावेळी काही वेळतच रिपोर्ट बदलला कसा …? धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिका पाहिजे असेल तर तीन हजार रुपये होतील… असे सांगण्यात आले.
फेरी दुसरी
नायडू रुग्णालया डॉक्टरांनी नातेवाईकांना चांगली वागणूक दिली. रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना धायरी येथील खासगी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. त्या अधी डॉक्टरांनी रक्तदाब, मधुमेह यासह आश्यक ती तपासणी करून जेवणही दिले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले.
फेरी तिसरी
रुग्णालयाच्या दारात पोहचताच पीपीई किट घातलेल्यांनी सांगितले “रुग्णाला तुम्ही आत आणून ठेवा’. नातेवाईकांनी तेही केले. मात्र, त्यानंतर तुम्ही घरी जावा आम्ही देतो लक्ष. करोनाचा पेशंट असल्यामुळे तुम्हाला आत सोडता येणार नाही. त्यानंतर वेळोवेळी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली तर उपचार सुरू आहे असेच सांगत असे. एकेदिवशी फोन आला “त्यांची प्रकृती अत्यावस्थ आहे,’ त्यांना चांगल्या रुग्णालयात हलवा. त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल केले.
फेरी चौथी, मात्र ती ठरली शेवटची
ससून रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत बराचवेळ झाला होता. किडनी निकामी झाली आणि 24 तासात त्यांनी ससूनमध्ये शेवटचा श्वास घेतला. रात्री अडीच वाजता नातेवाईकांना फोन आला.”तुमचा पेशंट गेला’, सही करायला उद्या या. सही करून ते नातेवाईक या फेऱ्यातून सुटले मात्र घरातला कर्ता माणूस गमावला. याला कारणीभूत कोण? असा ते प्रश्न आजही विचारतात.