बारामती/ जळोची -बारामती तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज
ठेवण्यासोबतच करोनाच्या चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामतीमधील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविडची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे,
पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे,
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ,
सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव उपस्थित होते.
पवार म्हणाले की, बारामती तालुक्यातील बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सर्तकता ठेवावी, गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्व्हेक्षणात सातत्य ठेवा.
विकासकामांबाबत दक्षता
बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन इमारत, परकाळे बंगला येथील कालव्यावरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन विश्रामगृह आदी विकासकामांची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना पवार यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.