जामखेड -राज्यात खासगी शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केलेला असतानाच सरकारी शाळांसाठी काय? हा प्रश्न पुढे येत आहे. मात्र कर्जत-जामखेडमधील 458 शाळांचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी सोडवला आहे. आ. पवार यांच्या पुढाकारातून व झोहो कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या दोन तालुक्यांतील पहिली ते सातवीपर्यंतचे 27 हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे पर्व सुरू झाले. येथील सरकारी शाळांतील विद्यार्थी आता डिजिटल पद्धतीने शिकणार आहेत.
खासगी शाळांप्रमाणेच अधुनिक पद्धतीने येथील शिक्षक मोबाईलवर वर्ग चालवतील अन् मुलांच्या हजेरीपासून धडा गिरविण्यापर्यंत व गृहपाठापासून ते अगदी परीक्षेपर्यंत सारे काही शाळेसारखेच असेल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी संकल्पना राज्यात राबवण्यासारखी असल्याचे मत व्यक्त करीत पवार यांचे कौतुक केले.
आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमदार पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेडमध्ये सुरू केलेल्या डिजिटल शाळांचे ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी झालेल्या वेबिनारमध्ये आमदार पवार यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, झोहो कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू, संचालक देव आनंद, नगरचे जिल्हा परीषद अध्यक्ष, उपाघ्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.
पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये आमदार होण्यापूर्वी व झाल्यापासून शिक्षणावरती अधिक भर दिला आहे. यापूर्वीही त्यांनी इंटरॅक्टिव्ह लर्निंग संच देऊन विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागवली होती. आता देवाणघेवाण होऊ शकते, त्यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धत हा पर्याय होऊ शकत नाही. सध्या करोनाच्या प्रसारामुळे सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचा पुरस्कार केला जात आहे त्या संबंधात त्यांनी हे मतप्रदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्याचे त्यांच्या शिक्षकांशी थेट कनेक्शन असण्याला या शिक्षण पद्धतीत खूप महत्त्व आहे.
विद्यार्थ्यांमधील खेळकरपणा, त्यांच्यातील कल्पनाशक्तीला वाव देणे ही उद्दिष्टे ऑनलाइन पद्धतीने साध्य होणार नाहीत. ते म्हणाले की, मुलांच्या बुद्धीची 85 टक्के वाढ वयाच्या आठव्या वर्षापर्यंत होते. त्यामुळे त्या वयाच्या मुलाच्या शैक्षणिक उन्नतीकडे जातीने लक्ष देणे आवश्यक असते. त्यासाठी शास्त्रावर आधारित नवीन शिक्षण पद्धतीचा आपण अवलंब केला पाहिजे. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांच्या बुद्धिमत्ता विकासाकडे नीट लक्ष देण्याची गरज आहे. त्याला चालनाही देण्याची गरज आहे. उच्च शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धत एकवेळ योग्य ठरू शकेल पण ज्यांच्या बुद्धिमत्तेच्या वाढीची प्रक्रिया सुरू आहे त्या मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धत योग्य नव्हे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
नेटवर्क अडचणीवर पर्याय शोधण्याचा प्रयत्न ः पवार
आमदार पवार म्हणाले, दोन्ही तालुक्यांतील मुले शिक्षणात मागे राहू नयेत, अशी मनोमन इच्छा होती. त्यातूनच झोहो वर्गाची निर्मिती झाली आहे. ही संकल्पना जर इतर लोकप्रतिनिधींना आवडली, राज्य शासनाला आवडली तर इतरही ठिकाणी ती सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात मोबाईल व नेटवर्कच्या अडचणी असतील. मात्र त्यातूनही मार्ग काढावा लागेल. येत्या काळात त्यावरही पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.