नवी दिल्ली : बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबर रहमान यांच्या जन्माशताब्दी निमित्त आशियाई संघ विरूध्द वर्ल्ड इलेव्हन यांच्यात दोन टी-२० सामने होणार आहेत. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी चार जणांची नावे पाठवली आहेत.
भारताकडून या दोन सामन्यांसाठी कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांची नावे पाठविण्यात आली आहेत.हे दोन्ही सामने बुधवार दि. १८ आणि शनिवार दि. २१ मार्च दरम्यान खेळवले जाणार आहेत.
आशियातील देश म्हणून पाकिस्तानचे खेळाडू देखील या सामन्यात खेळणार होते आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र खेळणार नाहीत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
बीसीसीआयचे सहाय्यक सचिव जयेश जाॅर्ज यांनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानचे खेळाडू या सामन्यात खेळणार नाहीत. त्यामुळे भारताने अखेर आपले चार नामांकित खेळाडू या प्रतिष्ठेच्या लढतीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.