बारामती – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य, भाजी मंडई व जनावरे बाजारात एरवी 10 ते 12 कोटींची उलढाल प्रत्येक महिन्याला होते. सध्या ही उलाढाल ठप्प झाली आहे. करोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असल्याने बाजार समितीत केवळ 10 टक्के अवक सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बंद पडले आहे.
जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यात आले आहे. असे असले तरी देखील इतर सर्वत्र लॉक डाऊन असल्याने त्याचा परिणाम बाजार समितीवर झाला आहे. शेतमालाची अवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. प्रत्येक महिन्याला बाजार समितीच्या आवारात गहू, ज्वारी, बाजरी व इतर धान्य तसेच भाजी मंडई आणि जनावरांचा बाजार मिळून कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र करोनामुळे ही उलाढाल थांबल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मालाची आवक कमी आहे. बाजार भाव देखील कोसळले आहेत. जिल्हा बंदी असल्याने बाहेरील आवक बंद आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवली आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने काहींनी हाता तोंडाशी आलेले पिके सोडून दिली
आहेत.
– अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती
करोनाचे संकट आल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा बंदी देखील केली आहे, त्यामुळे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्याची आवक घटली आहे. जिल्हा बंदी असल्या कारणाने बाहेरील व्यापारी अथवा शेतकरी बाजार समितीमध्ये माल घेऊन येऊ शकत नाहीत. बाजार समितीच्या आवारातील माल देखील मोठ्या प्रमाणात बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी मलाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.
– सुजय निंबळककर, सचिव, बारामती व्यापारी संघटना