सोरतापवाडी – श्रीगणेशाचे आगमन पाठोपाठ गौराईंचे स्वागतासाठी फुलांना जोरदार मागणी झाल्याने फुलांचे बाजारभाव वाढले आहे. त्यामुळे तब्बल पाच महिन्यांनंतर फूल उत्पादकांना चांगले दिवस आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत सोरतापवाडी परिसरात 50 लाखांचे उत्पन्न बुडाले असल्याचे सोरतापवाडी (ता. हवेली) परिसरातील फूल उत्पादकांनी सांगितले.
सोरतापवाडी परिसरात जवळपास 700 ते 800 हेक्टरव फूल शेती केली जाते. कितीही आर्थिक संकटे आली तरी येथील शेतकरी पिढ्यान्पिढ्या फुलशेती शेती करत आहेत. या परिसरातील झेंडू, गुलाब, ऍस्टर, गुलछडी, लिली आदी फुले विकत घेण्यासाठी सणासुदीला फुलबाजारात व्यापाऱ्यांच्या उड्या पडतात.
मार्च महिन्यापासून करोना महामारीमुळे मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. त्यातच लग्न सराईचा हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी पार विस्कटून गेली होती. तर महामारीचे संकट कमी होत नसल्याने शेतकऱ्यांनी फुलांची लागवड कमी केली आहे. आता गौरी-गणपतीमुळे तसेच येणाऱ्या नवरात्री व दिवाळीत फुलांना मागणी वाढली आहे. दरम्यान, मंदिरे अद्याप बंद आहेत, जर ती उघडली तर भावात आणखी वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.
फूल.. किलोचा भाव (रुपयांत)
- झेंडू… 100 ते 150
- शेवंती…150 ते 200
- गुलछडी… 250 ते 300
- गुलाब …30 ते 40 (गड्डी)
- लिली… 40 ते 50 (बंडल)
गणपती, गौरींमुळे सध्या फुलांना मागणी वाढली आहे. तर आता नवरात्र, दिवाळीत बाजारभाव असेच राहिले तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होईल.
– भाऊसाहेब चौधरी, सोरतापवाडी