मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. “संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावे आणि जमिनीवर काम करावे,” असे मत व्यक्त करत राऊत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधीच योग्य असल्याचं स्पष्ट केलं.
तत्पूर्वी, काँग्रेसच्या काही जेष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहीत पूर्णवेळ अध्यक्षाची निकड असल्याचं म्हंटल होत. या पत्राला प्रतिउत्तर देताना सोनिया गांधी यांनी अध्यक्ष पद सोडायला तयार आहे, दुसरा अध्यक्ष शोध असं म्हंटलं होत. यानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तूर्तास हा वाद मिटला होता.
अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, “काँग्रेस हा देशाला माहित असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे. सोनिया गांधी यांचे वय ७० पेक्षा जास्त आहे. इतकी वर्ष त्या नेतृत्त्व करत आहे. प्रियंका गांधी पूर्णवेळ राजकारणात दिसत नाहीत. इतर ज्येष्ठ नेते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावे आणि जमिनीवर काम करावे,” अशी भूमिका मांडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे
“उद्धव ठाकरे कधीही आडपडदा ठेवून बोलत नाही. पोटात एक आणि ओठावर दुसरे असे कधीच नसते. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे माझे मत आहे. उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय नेतृत्त्वाची मानसिकता होताना मला दिसत आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.