नगर -करोनामुळे सर्वच आर्थिक अडचणीत सापडले असून, यामधून बाहेर पडण्यासाठी जिल्हा सहकारी बॅंकेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळून आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.
जिल्हा बॅंकेने घेतलेल्या निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे. सर्वसंचालक मंडळाच्या एकमताने हे सर्व निर्णय घेतल्याने शेतकरी वर्ग सुखावणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतल्याबद्दल नगर बाजार समिती खरेदी-विक्री संघ, दूध संघ व पंचायत समिती सदस्यांच्यावतीने अध्यक्ष सीताराम गायकर, उपाध्यक्ष रामदास वाघ, शिवाजी कर्डिले व संचालक मंडळांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विलास शिंदे, हरिभाऊ कर्डिले, बन्सी कराळे, रेवन चोभे, संतोष कुलट, बबन आव्हाड, शिवाजी कार्ले, बहिरु कोतकर, बाबासाहेब खर्से, अंबादास बेरड, प्रा. संभाजी पवार, किसन बेरड, बाळासाहेब निमसे, राहुल पानसरे, दीपक कार्ले आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी कर्डिले म्हणाले की, बॅंकेने शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. सर्व सभासदांना 3 लाखापर्यंतच्या कर्जावर दोन टक्के व्याज माफ करण्यात येणार आहे. 8 अ 7/12 संयुक्त उतारे असणाऱ्या शेतकऱ्यांना वैयक्तिक हमीवर पीककर्ज वितरित करण्यात येणार आहे. राष्ट्रीयकृत बॅंका, पतसंस्था यांनी वितरित केलेल्या मध्यम मुदत कर्जदार सभासदांना जिल्हा बॅंकेमार्फत पीककर्ज वितरित करण्यात येणार आहे. मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज थकित असणाऱ्या कर्जदाराला पीककर्ज वितरित करण्यात येणार आहे.
तसेच 31 जानेवारी अखेर वसुलीस पात्र असणाऱ्या मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्जाच्या हप्त्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसेच सभासदांना भांडवली स्वरुपाचे 10 गायीपर्यंत प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या कर्जाची एक वर्षासाठी उपलब्धता दिली करुन दिली आहे.
घिगे म्हणाले की, नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. पावसाच्या पाण्यावरती शेती अवलंबून आहे. तालुक्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. यासाठी कर्डिले यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना घेतलेल्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
यावेळी बॅंकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, बाजीराव खेमनर, माजी आ. वैभव पिचड, माजी आ. चंद्रशेखर घुले, रावसाहेब शेळके, दत्ता पानसरे, अंबादास पिसाळ, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.