ढाका – म्यानमारमधून बांगलादेशमध्ये आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांना माघारी पाठवण्याच्या मुद्यावर बांगलादेशने चीनची मदत मागितली आहे. बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांच्याकडे या मुद्यावर सहाय्य करण्याचे आवाहन बांगलादेशने केले आहे.
म्यानमारमधून बांगलादेशमध्ये ऑगस्ट 2017 मध्ये सुमारे 7 लाख रोहिंग्यांनी पलायन केले होते. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये माघारी नेण्यासंदर्भात 2017 च्या नोव्हेंबर मध्ये बांगलादेश आणि म्यानमारदरम्यान एक करार करण्यात आला होता. या करारासाठी चीनने म्यानमारवर दबाव आणला होता. मात्र त्या कराराची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही.
म्यानमारमध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देऊन रोहिंग्यांनी बांगलादेशातून म्यानमारमध्ये परत जाण्यास नकार दिला आहे. त्यात गेल्याच वर्षी म्यानमारमध्ये लष्करी शासन लागू झाले आहे. त्यामुळे रोहिंग्यांची माघारी अधिकच अवघड बनली आहे. या पार्श्वभुमीवर बांगलादेशने रोहिंग्यांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा चीनची मदत मागितली आहे.
वॅंग यी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि परराष्ट्र मंत्री ए के अब्दुल मोमेन यांची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली आणि बांगलादेशात अधिक व्यापक गुंतवणूक, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि विकास प्रकल्प राबवण्याचे आश्वासन वॅंग यी बांगलादेशला दिले आहे.