नवी दिल्ली – लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन चार दिवस आधीच समाप्त झाले. अधिवेशनाचा प्रारंभ 18 जुलैला झाला. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ते 12 ऑगस्टला समाप्त होणार होते. मात्र, त्याआधीच ते गुंडाळण्यात आले.
अधिवेशन काळात लोकसभेचे 16 दिवस कामकाज झाले. त्या कालावधीत 7 विधेयके मंजूर करण्यात आली, अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली. तर, राज्यसभा सचिवालयाकडून सभागृहाच्या कामकाजाची माहिती नंतर देण्यात येईल, असे मावळते अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांनी नमूद केले.
अधिवेशनावेळी विरोधकांनी महागाई आणि इतर मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यामुळे प्रचंड गदारोळ होऊन बरेच कामकाज वाया गेले.