नवी दिल्ली – देशात कर्करुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून त्यामध्ये तंबाखू खाण्याच्या व्यसनाचा मोठा हातभार आहे. भारतातील कर्करुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे तंबाखूमुळे या व्याधीला बळी पडत असल्याचे संसदेच्या स्थायी समितीने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
त्यामुळे तंबाखूच्या विक्रीवरील निर्बंध कडक केल्यास तोंडाच्या कर्करोगाला नियंत्रणात आणण्यास मदत होईल असे समितीने म्हटले आहे. त्याचबरोबर सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी आणि व्यापार, व्यवसाय, उत्पादन, पुरवठा, वितरण यांचे नियमन करणारा सिगारेटस् अँड अदर टोबॅको प्रॉडक्टस् ऍक्ट म्हणजेच कोटपा (2003) याचे कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे या समितीने सुचवलेले आहे.
राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कर्करोग नियंत्रण योजना आणि व्यवस्थापन- प्रतिबंध, निदान, संशोधन आणि कर्करोगावर कायमस्वरुपी उपचारांविषयी या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. कर्करोगाच्या उपचारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येतात आणि दुसरीकडे कर्करोगाचे मूळ असणाऱ्या तंबाखूच्या सेवनाला प्रतिबंध करण्यासाठी पुरसे लक्ष दिले जात नाही, अशी खंत या अहवालात व्यक्त करण्यात आलेली आहे.
तंबाखू, सिगारेटचे व्यसन करणाऱ्यांपैकी बहुतेकांना त्याची सवय किशोरवयातच लागलेली असते. त्यानंतर व्यसनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण भारतात खूपच कमी आहे. त्यामुळे किशोरवयात तंबाखूचे व्यसन लागण्यापासून तरुणांना रोखण्यासाठी व्यूहरचना निश्चित करण्याची शिफारस समितीने केली आहे.
2017 च्या ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्वेनुसार भारतात सुमारे 27 कोटी लोकांना तंबाखू-सिगारेटचे व्यसन आहे. चीननंतर तंबाखूचे व्यसन असणारी सर्वाधिक लोकसंख्या भारतात आहे. तंबाखू-सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे दरवर्षी 13 लाख इतके आहे. तंबाखू-सिगारेटमुळे होणाऱ्या आजारांवर उपचारांसाठी दरवर्षी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे 1,82,000 कोटी रुपये खर्च केले जातात. भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) जवळपास 1.8 टक्के रक्कम ही कर्करुग्णांच्या उपचारांवर खर्च होते. ग्लोबल युथ टोबॅको सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भारतात 13 ते 15 वयोगटातील पाच विद्यार्थ्यांपैकी एक जण तंबाखू-सिगारेटचे सेवन करत असतो.
वर्ष – कर्करोगाचे निदान झालेल्यांची संख्या
2018 : 13,25,232
2019 : 13,58,415
2020 : 13,92,179
टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांनी संसदीय समितीच्या शिफारशींना पाठिंबा देताना म्हटले आहे की, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांची परिणिती म्हणजे हे आजार व्यक्तीचा आनंदाने आणि निरोगीपणे जगण्याचा अधिकार हिरावून घेतात. एखाद्या व्यक्तीला वयाच्या एकविशीपर्यंत तंबाखूचे व्यसन लागले नाही तर तो आयुष्यभर तंबाखूपासून दूर राहतो, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ते म्हणाले, की अनेक देशांमध्ये तंबाखूच्या उत्पादनांची विक्री 21 वर्षावरील व्यक्तींनाच केली जाते. आपल्या देशातही ही मर्याद 18 वरून 21 पर्यंत वाढवण्यात यावी. कोटपा कायद्यामध्ये सुधारण करून धूम्रपानाच्या जागा, विक्रीसाठीच्या जाहिराती यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. जेणेकरून तरुणांना तंबाखूचे व्यसन लागण्यापासून दूर ठेवता येईल.