जागतिक तंबाखू विरोधी दिनी डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी
पुणे – तंबाखूच्या सेवनामुळे भारतात दररोज जवळपास 10 हजार लोक मृत्यूला सामोरे जात आहेत. हृदयरोग, कर्करोग, एड्स यापेक्षाही तंबाखूचे व्यसन अधिक घातक आहे. त्यामुळे विषवल्ली तंबाखूला समाजातून हद्दपार करण्यासाठी तंबाखूचा समावेश अंमली पदार्थांच्या यादीत करून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी शाकाहार आणि व्यसनमुक्ती कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली.
31 मे हा दिवस जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गेली 30 वर्षे तंबाखूमुक्त भारत आंदोलन राबवणारे सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे डॉ. गंगवाल यांनी पत्रकाद्वारे मागणी केली.
तंबाखू शेतीवर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे. तरुण पिढीला तंबाखूमुक्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणे गरजेचे आहे. सिगारेट, बिडी, जर्दा, मावा, गुटखा, मशेरी, तपकीर याचा वापर करू नये. तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले आहे.