पुणे – खासगी विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एसएससी बोर्डाची मान्यता असलेल्या काही संस्थांनी “बालभारती’च्या पुस्तकांना बाजूला टाकत खासगी प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांचे “ओझे’ विद्यार्थ्यांच्या पाठीवर आणि पालकांच्या खिशावर लादले आहे. सक्ती केली जात असल्याने पालकही नाईलाजास्तव ही पुस्तके खरेदी करत आहेत.
यंदा इयत्ता पहिलीसाठी एकात्मिक अभ्यासक्रमांतर्गत बालभारतीने पुस्तके प्रकाशित केली आहेत. यात पुस्तके आणि वहीसारखी असणारी कोरी पाने पुस्तकातच समाविष्ट आहेत. याचा मूळ उद्देश म्हणजे, विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करणे हा आहे. या एका संचाची किंमत 285 रुपये आहे. तर, शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी काही खासगी शाळांनी पालकांना आपल्याच “शाळेच्या दुकानातील’ पुस्तके खरेदी करण्याचे बंधन घातले आहे.
त्यात खासगी प्रकाशन संस्थांची पुस्तके पालकांना विकली जात आहेत. इयत्ता पहिलीसाठी एका संचाची किंमत सुमारे 1,400 रुपये इतकी आहे. यात सुमारे नऊ पुस्तके आणि तितक्याच वह्या आहेत. त्यामुळे दप्तराचे “ओझे’ कमी होण्यापेक्षा संस्थाचालकांच्या खिशाचे “वजन’ वाढत आहे.
बालभारती पुस्तकांची यादी बोर्डावर
काही शाळांनी खासगी पुस्तके स्वत: विकण्याचा “व्यवसाय’ सुरू केला आहे. तर, बालभारतीच्या पुस्तकांबाबत विचारणा केली असता, “पुस्तकांची यादी बाहेर बोर्डवर लिहिली आहे. तुम्ही पाहिजे तेथून घेऊ शकता. पण, नाही घेतली तरी चालतील,’ असे स्वत: मुख्याध्यापक सांगत आहेत. त्यामुळे या शाळांच्या लेखी “बालभारती’ची किंमत शून्य असल्याचे स्पष्ट आहे.
“कमिशन’चा खेळ
सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली काही शाळांनी “एनसीईआरटी’च्या पुस्तकांना डावलून खासगी प्रकाशन संस्थांशी दोस्ती केली. आता अशीच प्रवृत्ती एसएसएसी बोर्डाच्या शाळांमध्ये शिरली आहे. एका संचामागे सरासरी 20 टक्के कमिशन मिळत असल्याने अशा पुस्तकांची सक्ती केली जात आहे.
तज्ज्ञ म्हणतात..
‘राज्य मंडळाची शाळा असेल, तर बालभारतीची पुस्तके वापरणे बंधनकारक आहे. सीबीएसई बोर्डाची शाळा असेल, तर “एनसीईआरटी’ची पुस्तके वापरणे आवश्यक आहे. पण, जर हे डावलून एखादी शिक्षण संस्था खासगी पुस्तके वापरत असेल, तर ते आक्षेपार्ह आहे. याबाबत शिक्षणाधिकारी, शिक्षण आयुक्त यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे,’ असे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले.