मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसाने सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. शेतातली पिकं जमीनदोस्त होताना बळीराजाला पाहावं लागत आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. हे एवढं नुकसान कमी होत कि काय आता राज्यात पुढचे आणखी पाच दिवस गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
राज्यात पुढचे पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागणार असल्याचे दिसून येत आहे.
पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीसी उघडीप राहील. राज्यात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे.
उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-विदर्भात 2-3 दिवस पावसाची उघडीप असेल.