पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सुमारे दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर बालगंधर्व रंगमंदीर कलाकार आणि रसिकांसाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता नाट्यप्रयोगाने या रंगमंचाच्या वापराला सुरूवात करण्यात आली.
आसनव्यवस्थेतील बदल, रंगकाम, विद्युत तथा वातानुकुलित यंत्रणेतील बदल, नवीन खुर्च्या, लाल रंगाचे कार्पेट असे रंगमंचाचे बदललेले स्वरूप आहे. रंगमंदिरात व्हीआयपी रूमचेही नुतनीकरण करण्यात आले आहे.नाटकासाठी आलेल्या कलाकारांनी आणि रसिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील सोयी-सुविधांच्या अभावाबद्दल कलाकारांकडून, रसिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या. दि. १६ फेब्रुवारीपासून नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ते पूर्ण करून गुरूवारी (दि. २८ मार्च) हा रंगमंच नव्या स्वरूपात खुला करण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिरातील देखभाल-दुरुस्तीचे काम झाले आहे. भवन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात आले. गुरुवारी दुपारी नाटकाचा प्रयोगही झाला आणि त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नाट्यगृहातील बदल पाहून कलाकारांसह रसिकांनीही चांगला अभिप्राय दिला आहे.
– राजेश कामठे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर