पिंपरी – “जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 कलम रद्द करून गरम झालेल्या तव्यावर सरकारला पोळी भाजण्याची घाई झाली आहे. सध्या ज्या पद्धतीने देशातील लोकशाही व्यवस्था दडपली जात आहे, त्याला विरोध करणे आवश्यक आहे. ईव्हीएम विरोधात अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात मोठी चळवळ उभी करण्यात येणार आहे”, असे प्रतिपादन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी-मोरवाडी येथील खासगी हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते. मनसे नेते अविनाश अभ्यंकर, किशोर शिंदे, राजेंद्र वागस्कर, अनिल शिदोरे, रिटा गुप्ता, सचिन चिखले, राजू साळवे, बाळा दानवले, अंकुश तापकीर, अश्विनी बांगर, हेमंत डांगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नांदगावकर म्हणाले, “आत्तापर्यत ज्या ठिकाणी ईव्हीएमशिवाय निवडणुका झाल्या त्या ठिकाणी सत्ताधारी पक्ष पराभूत झाले आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत उपस्थित होणाऱ्या शंकेला वाव आहे. चालू महिन्याच्या अखेरीस ईव्हीएम विरोधात मोर्चाचे नियोजन केले होते. मात्र, राज्यातील पूर परिस्थिती पाहता हे आंदोलन पुढे ढकलले आहे.”
अभ्यंकर म्हणाले, “सध्या देशात कोणाचीही लाट असली तरी ईव्हीएम विरोधात राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आंदोलन करण्याची तयारी ठेवा. लोकशाही टिकविण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे आहे.”