गरिबांपासून ते श्रीमंतांच्या पसंतीस असलेला बेकरी पाव कुठे मिळत नसेल असे ठिकाण पिंपरी चिंचवड शहरात सापडणे कठीण आहे. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊन सकाळची पोटपूजा यावरच सहसा अवलंबून आहे. शहरातील चौका-चौकांत उभारलेल्या खाऊगल्ल्या व येथे असलेली खवय्यांची गर्दी मनसोक्त मिसळ पाव, वडापाववर ताव मारताना दिसतात.
एक वेळची सांज भागविणाऱ्या व अन्न पदार्थात समावेश असणाऱ्या पावाची शहरात मोठी मागणी आहे. मात्र, बेकरीपासून ते थेट व्यावसायिकांपर्यंत बेकरी पावाचा होणारा प्रवास थक्क करणारा आहे. स्वच्छतेचे कुठलेही निकष न पाळता पावाची असुरक्षित वाहतूक म्हणजे भोसरीकरांच्या आरोग्यासोबत खेळ होत असल्याचे धक्कादायक वास्तव छायाचित्रातून समोर आले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने स्वच्छतेकडे डोळेझाक
स्वच्छतेचे किती महत्त्व आहे. हे दोन वर्षांत करोनाने दाखवून दिले आहे. नागरिक सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर राहून स्वच्छतेचे निकष पाळताना दिसत होते.
मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांना आणि व्यावसायिकांना स्वच्छतेचा विसर पडला आहे. बेकरी व्यवसायिकांची स्वच्छता कितपत आरोग्यदायी असते असाही प्रश्न सामान्य नागरिकांना पडू शकतो.
अन्न सुरक्षा विभागाकडून बघ्याची भूमिका
सकाळ झाली की पावासोबत दिवसाची सुरुवात होते. चौकात काळ्या पिशव्या घेऊन जाणारा व्यक्ती डोळ्यास पडला तर पावविक्रेता असल्याचे कुणीही लांबूनच सांगेल. परंतु अन्न सुरक्षा विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. अशा अस्वच्छ पिशव्यांमधून शहरवासीयांचे अन्नपदार्थांची वाहतूक होते परंतु प्रशासन काहीच पावले उचलत नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. अन्न सुरक्षा विभाग केवळ हाताची घडी तोंडावर बोट आणि डोळ्याला पट्टी बांधून काम करत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बेकरी पावाची उघड्यावर वाहतूक
शहरात असणाऱ्या असंख्य खाऊगल्लीतील व्यावसायिकांना पाव पोहोच मिळतात.जोडधंदा म्हणून अनेक नागरिक पाव पोहचविले जातात. पाव पोहचविण्यासाठी सायकल, दुचाकीचा वापर छोटे व्यावसायिक करतात. या वाहनांवर काळ्याकुट्ट झालेल्या पिशव्या अडकवलेल्या असतात. त्या पिशव्यांची स्वच्छता केलेली नसते. अशा पिशवीतून पावाची वाहतूक केली जाते. पाव पोहचवून देणारा सुद्धा स्वच्छतेला तिलांजली देत पावाची हाताळणी करताना दिसतो. व्यावसायिकांना पाव पोहोच केल्यावर सुद्धा बेकरी पावाची हेळसांड थांबत नाही. तेथे सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत तीन तेरा वाजलेले पाहायला मिळतात. हे सर्व प्रकार नागरिक उघड्या डोळ्यांनी बघत असतात. मात्र, आपल्या आरोग्यासाठी घातक ठरणारी शहरातील बेकरी पावाची वाहतूक याबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत याबद्दल आश्चर्य वाटते.