“संकल्पना’चे फलक बंद करण्याचा पवित्रा
पुणे – महापालिकेच्या निधीतून जवळपास सर्वच नगरसेवकांनी विकासकामांची माहिती देणारे डिजिटल फलक लावले आहेत. यासाठी महापालिकेच्या पथदिवे अथवा स्वतंत्र मीटर घेऊन वीज वापरण्यात येत आहे. या चमकोगिरीचे बिल मात्र महापालिकेच्या माथी मारले जात आहे. त्यामुळे, किमान निवडणुका होईपर्यंत तरी या फलकांची वीज तोडावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
शहरात प्रत्येक प्रभागात असे शेकडो फलक लागले असून त्यावर लाखोंचे बिल महापालिकेस मोजावे लागत आहे. पथदिवे, पुस्तकघर, बसथांबे , वाचनालये, ओपन जीम, रस्त्यांवर उभारलेली वेगवेगळी शिल्प, रस्त्यावर केलेली विकासकामे, स्वच्छतागृह, ज्येष्ठ नागरिक कट्टे, प्रार्थना स्थळे, सेल्फी पॉइंट अशा ठिकाणी हे संकल्पनांचे डिजिटल फलक लावण्यात आलेले आहेत.
वीज बिलाने मोडले पालिकेचे कंबरडे
महापालिकेस मागील वर्षी 297 कोटींचा खर्च वीज बिलावर करावा लागला आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा वीज खर्च वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार वाढणारे वीजेचे दर, महापालिकेकडून शहरभर केली जाणारी विद्युत रोषणाईची कामे, महापालिकेच्या विजेचा गैरवापर, वीज चोरी, अनावश्यक वापर अशा कारणामुळे वीज खर्च वाढत आहे.
आता गेल्या दोन वर्षांपासून नगरसेवकांच्या “स’ यादीतून केल्या जाणाऱ्या अशा कामामुळे वीज बिलही वारेमाप वाढले आहे. खर्च कमी करण्यासाठी प्रशासन बचत करणारे पथदिवे लावत असताना दुसऱ्या बाजूला मात्र, अशा प्रकारे संकल्पनांचे फलक लावून वीज खर्च वाढविला जात आहे.
तातडीने फलक काढावेत : मनसे
नागरिकांच्या पैशांतून उभारण्यात आलेले हे डिजिटल फलक तातडीने काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राहुल तुपेरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. प्रा. किरण गायकवाड, उमेश चव्हाण, मीरा तुपेरे, कुणाल वाघमारे, हीराचंद वाघमारे उपस्थित होते.
रात्रभर सुरू असतात फलक
महापालिकेने लावलेल्या अशा डिजिटल फलक रात्रभर सुरू असतात, प्रत्यक्षात असे फलक रात्री 12 पर्यंत बंद केले, तरी मोठ्या प्रमाणात वीज बचत होऊ शकते. मात्र, कोणीही नसले तरी केवळ नगरसेवकांचे नाव चकमत रहावे, या उद्देशाने हे फलक रात्रभर उजळविले जात आहेत, आता लाखो रुपये खर्चून लावलेले हे फलक काढणे शक्य नसले तरी किमान ते रात्री काही ठराविक वेळेनंतर तरी बंद केल्यास मोठी वीज बचत होईल.