मुंबई: भाजपाकडे अनेक वर्षांपूर्वी केवळ दोनच खासदार होते. पण २०१४ नंतर लोकसभेच्या दोन्हीं टर्ममध्ये भाजपाला बहुमत मिळाले. त्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आणि केंद्र सरकारला सत्ता प्राप्त झाली. याउलट महाराष्ट्रात भाजपाला वाईट दिवस आले ते नेत्यांच्या अहंकारी भाषेमुळे. त्यामुळे भाजपा नेते आशिष शेलार यांनी यापुढे दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रात काय केलं पाहिजे, यावर बोलणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फटकारले.
रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र विकास आघाडी चांगलं काम करत राहील. बोलत राहणे हे विरोधकांचं काम आहे तर लोकांसाठी काम करत राहणं आमचं काम आहे. काम केल्यानेच यश मिळतं, असा टोला रोहित पवार यांनी आशिष शेलार यांना त्यांच्या मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील वक्तव्याबाबत लगावला.
कर्जमाफी संदर्भात रोहित पवार म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफीची घोषणा केली गेली, मात्र अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. एसबीआयच्या अहवालानुसार सरासरी ७७ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचे सांगितले गेले. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेली कर्जमाफी ही ७७ हजार शेतकऱ्यांपेक्षा कित्येक पट जास्त आहे.
प्राथमिक स्वरूपात १५ हाजार शेतकऱ्यांची कर्जामाफी जाहीर झाली होती, त्या शेतकऱ्यांना पैसेही मिळाले आहेत. आता दोन जिल्ह्यांतील अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे. रांगेत उभे न राहता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, यामध्ये एखादी बँक अडथळा आणत असेल तर, यासंदर्भात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.