माधव विद्वांस
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार “कलामहर्षी’ बाबुराव पेंटर यांचे आज पुण्यस्मरण (निधन 16 जानेवारी 1954) त्यांचा जन्म 22 जून 1890 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. त्यांचे वडील स्वतः कलाकार होते. त्यांचा सुतारकाम व लोहारकाम हा व्यवसाय होता. त्यामुळे कलेचा वारसा घरातूनच आला. त्यांनी कोणतेही चित्रकलाविषयक शिक्षण घेतले नव्हते. तथापि, त्यांच्याकडे ही कला उपजत आली होती. लहानपणापासूनच ते उत्तम तैलचित्रे काढीत असत. त्यांच्याबरोबर सतत असणारे आतेबंधू आनंदराव हेही कलाकार होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबुराव पेंटर यांची कलाक्षेत्रास प्रथम ओळख झाली. त्यांनी तयार केलेली सिनेमांची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सोलोमन यांनी वर्ष 1930च्या सुमारास त्यांचा सत्कार केला होता. काहीही शिक्षण घेतलेले नसताना देखील रंगमिश्रण, प्रमाणबद्धता, रंगाची शुद्धता या विषयीचे ज्ञान पाहून सोलोमन साहेबांनी त्यांचे कौतुक केले.
रंगकामावर न थांबता त्यांचे कार्य विस्तारत गेले. शिल्पकला ती मातीमध्ये असो वा धातूंमध्ये त्यामध्ये त्यांनी नैपुण्य दाखवून दिले. त्यांनी केलेल्या कलाकृती आजही कोल्हापूरसह अनेक ठिकाणच्या संग्रहालयात बघण्यास मिळतात. चित्रपट व्यवसायाशी संबंध आल्यावर त्यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. चित्रपट व्यवसायासंबंधी सेट उभे करण्यापासून दिग्दर्शन, चित्रीकरण निर्मिती अशा सर्वच गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. बाह्यचित्रीकरण व विजेच्या प्रकाशातील चित्रीकरण त्यांनीच पहिल्यांदा केले.
त्यांनी वर्ष 1918मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली व स्त्रीपात्रे असलेला “सैरंध्री’ हा पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला. हा चित्रपट पुण्यातील “आर्यन’ थिएटरमध्ये तो 7 फेब्रुवारी, 1920 रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य प्रभावी झाले होते. या दृश्यामध्ये कोणतेही ट्रिक सीन्स वापरलेले नव्हते. “कीचकवध’ या चित्रपटातील सिनेमात कीचकाचं मुंडकं धडावेगळं होतं हा सीन बाबुरावांनी कसलेही स्पेशल इफेक्ट नसताना असा काही बेमालूम वठविला की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी “तुम्ही सिनेमासाठी एक माणूस मारला, तुम्हाला अटक का होऊ नये’ अशी “कारणे दाखवा’ नोटीस पाठवली. तेव्हापासूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली.
वर्ष 1925 साली “सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. विशेष म्हणजे बाबुरावांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून या चित्रपटाची निर्मिती केली. कलामहर्षींना अभिवादन.