कोलकाता : महाभारतामधील अर्जुनाच्या बाणांना आण्विक शक्ती प्राप्त होती, असे अजब विधान पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखार यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर चहुबाजूंनी जोरदार टीका झाल्यानंतरही त्यांनी या विधानावर आपण ठाम असल्याचे सांगितले.
स्वतःच्या विधानाचे समर्थन करताना राज्यपाल महोदयांनी विरोधकांनाच भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.
सुमारे 4 हजार वर्षांपूर्वी भारत हा जागतिक नेतृत्वाचे केंद्रबिंदू होता. या कालावधीचे ऐतिहासिक कालखंड म्हणून गौरवला जातो, असे राज्यपाल म्हणाले.
मात्र त्यांच्या या वक्तव्यावर शिक्षण तज्ञांकडून जोरदार टीका केली आहे. पौराणिक काळातील विज्ञानाचे दाखले यापूर्वी ज्या राजकारण्यांनी दिले होते. त्यांच्यावरही अशाच प्रकारे जोरदार टीका झाली होती.
“भारतीय विज्ञान आणि संस्कृतीबाबत वाचन करावे. हे अवैज्ञानिक आहे असे म्हणणे खूप सोपे आहे.
आपण जगाला ते दिले आहे, जे जगाकडे कधी नव्हते. आपल्या देशाला 4-5 हजार वर्षांचा सांस्कृतिक इतिहास आहे.’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
45 व्या पूर्व भारतीय विज्ञान परिषदेमध्ये बोलतान धनखार यांनी “उडणाऱ्या वस्तू रामायणाच्या काळातही अस्तित्वात होत्या.’ असे वक्तव्य केले होते.
विमानाचा शोध 1910 मध्ये लागला. मात्र रामायणात विमानाचा उल्लेख होता. महाभारतात संपूर्ण युद्ध धृतराष्ट्राला सांगणाऱ्या संजयकडे दिव्यदृष्टी होती, टिव्ही नव्हता. अर्जुनाच्या बाणांमध्ये आण्विक शक्ती होती, असेही धनखार यांनी सांगितले होते.