बदलत्या जीवनशैलीमुळे अलीकडे तारुण्यातच लठ्ठ होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शरीरातील प्रत्येक अवयव ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे. अन्यथा वेगवेगळे विकार आपली सोबत करू शकतात. स्थूलपणावर आयुर्वेदात उपाय आहेत. त्याचा वापर केल्यास आपलं शरीर बेढब होणार नाही.
सडपातळ, लवचिक शरीर हे तारुण्याचं एक लक्षण असतं. ही देणगी नसणारी व्यक्ती तरुण असली तरीही तरुण वाटत नाही. आजकाल तर फिजिकल फिटनेसचा जमाना आहे. त्यामुळे शरीर सडपातळ ठेवण्याकडे, त्यासाठी व्यायाम, डाएटिंग वगरे करण्याकडे अनेकांचा कल असतो. आयुर्वेदही या दृष्टीने व्यक्तीला अत्यंत उपयुक्त मदत करू शकतो.
वेळीच काळजी घेतल्यास लठ्ठपणा आटोक्यात आणता येतो. मात्र त्यासाठी आहार, विहार आणि उपचार यांची योग्य दिशा ठरवायला हवी. काही नियमांचं काटेकोर पालन करायला हवं. पथ्यपाणी, व्यायाम, औषधी उपाययोजना यांचा विचार रुग्ण अगोदर का करीत नाहीत? स्थूलपणाचं मूळ कारण कफ या दोषाच्या प्रवत्तीत आहे. कफ म्हणजे मंद, सावकाश, मुंगीच्या गतीने हालचाल. त्यामुळे मेद, चरबी वाढतेय हे लक्षात येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो. त्यानंतर मनुष्य थोडा आळस आणि चुकीचे उपचार करतो. मग मात्र रोग पक्कं घर करून बसतो. काही पालकांना त्यांची मुलं लठ्ठ होत आहेत हेच पटत नाही. आपली मुलं सुदृढ आहेत असंच त्यांना वाटतं. सुदृढ आणि सुजलेलं शरीर यातील फरक त्यांच्या लक्षात येत नाही.
आनुवंशिकता आणि बीजदोष ही लठ्ठपणाच्या दृष्टीने गुंतागुंतीची कारणं असतात. मुलांकडे नीट लक्ष देणं, त्यांच्यावर अवाजवी बंधनं घालणं यामुळेही त्यांच्या शरीरात चरबी साठू लागते. आजचं जीवन यांत्रिक बनलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी विनाश्रम मिळण्याची व्यवस्था झाली आहे. व्यायामाचा, हालचालीचा अभाव, बैठं काम आणि सुखासीन जीवन हा अनेकांचा जीवनक्रम बनला आहे. मेद वाढवणारी दुपारची झोपही त्यात येतेच. थंड, जड, गोड, आंबट खारट पदार्थाचा अतिरेकी वापरही लठ्ठपणा वाढवायला कारण ठरतो. मेदवर्धक आणि मांसवर्धक पदार्थाचा अतिरेकी आहारही त्यात भर घालतो. कारण त्यामुळे फक्त मेद, मांसधातूचं पोषण अधिक होतं.
फास्ट फूडच्या नावाखाली अलीकडे अनेक जण पोटात वाट्टेल ते ढकलत असतात. त्यात मांसाहार, मद्यपान, आइस्क्रीम, मेवामिठाईचा आस्वाद यांची भर पडते. तेलकट, तूपकट आहारही लठ्ठपणाच्या दृष्टीने हानिकारक असतो. खाण्यात गहू, हरभरा, कडधान्य, कांदा, बटाटा, साखर यांचं प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असणं हेही मेदवाढीचं एक महत्त्वाचं कारण ठरतं.
अनेक स्त्रियांना विटाळ कमी जातो, पाळी अनियमित असते. त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. पाळी चुकवण्यासाठी गोळ्या, औषधं घेणं किती हानिकारक ठरत असेल याची कल्पना केलेली बरी. उपाययोजना करण्यासाठी या कारणांचा शोध घेणं आणि लक्षणं समजावून घेणं अर्थातच आवश्यक आहे.
लठ्ठपणाच्या विकाराची काही प्रमुख लक्षणं उंचीच्या मानाने वजन जास्त असणं, पोट, छाती, कुल्ले, मांडया मान या ठिकाणी बेढबपणा येणं, थोडयाशा श्रमाने धाप लागणं, पायावर, चेह-यावर सूज येणं, लघवी कमी होणं, लघवीला पुन्हा पुन्हा जावं लागणं, स्त्रियांना विटाळ कमी जाणं, अंगाला खाज सुटणं, त्वचा फाजील स्निग्ध दिसणं, कार्यशक्ती कमी होणं, विश्रांती घ्यावीशी वाटणं, जास्त झोप येणं, अंगाला घाण वास मारणं अशी लठ्ठपणा येण्याची लक्षणं असू शकतात. लठ्ठपणावर उपाय करायला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम वजन पाहणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर कोणते स्नायू शिथिल आहेत, कुठे चरबी वाढली आहे हेही पाहायला हवं, त्यामुळे नेमका व्यायाम सुचवणं सोपं जातं.