सातारा – शिवसेनेत झालेल्या बंडखोरी नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला. त्यासाठी ‘चलो अयोध्या’ असा नारा देत शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली होती. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक शिवसैनिकांनी जय श्री राम आणि शिवसेनाच्या घोषणा देत अयोध्याकडे कूच केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अयोध्या दौऱ्यावर गेले होते.
तसेच शिंदे गटातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी राम मंदिराच्या निर्माणाची पाहणीही देखील केली. मुख्यमंत्री शिंदेंनी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. सध्या संपूर्ण राज्यात शिंदे गटाच्या या दौऱ्यावर चर्चा होताना दिसत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.
दरम्यान, अश्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा अयोध्या दौऱ्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. सध्या अजित पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असून, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधताना आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “आताच्या ताज्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांचा हा अयोध्या दौरा होता. प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले. मात्र, आम्ही कधी इकडे जाणार.. तिकडे जाणार.. हे सांगत नाही. आम्ही पण मंदिरात जातो, पण पब्लिसिटी करत नाही. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यास, द्वेष पसरवण्यास कोणी करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे’. अशी भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.