नवी दिल्ली : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागणार आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग 40 दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 16 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं असून, देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
अयोध्या पर सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा, वो किसी की हार-जीत नहीं होगा। देशवासियों से मेरी अपील है कि हम सब की यह प्राथमिकता रहे कि ये फैसला भारत की शांति, एकता और सद्भावना की महान परंपरा को और बल दे।
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. अयोध्येच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जो काही निकाल येईल, तो कुणाचा विजय किंवा पराभव नसेल. देशवासियांना मी आवाहन करतो की हा निकाल भारताच्या शांती, एकात्मता आणि परस्परांविषयीच्या सद्भावनेच्या परंपरेला आणखी शक्ती देईल, असं मोदी यांनी म्हटलं आहे. तर संघ परिवार तसेच, मुस्लीम संघटनांनीही लोकांना शांतता राखण्याचे आणि निकालाचा आदर करण्याची विनंती केली आहे. दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडयात बैठकाही झाल्या होत्या.