नवी दिल्ली – अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामुळे देशभरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत व्यापार्यांची एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचे व्यापार्याच्या संघटनेने म्हटले आहे.
ऑल इंडिया ट्रेडर्स कन्फेडरेशन या संघटनेने यासंदर्भात मूल्यांकन केले आहे. देशातील 30 मोठ्या शहरातील व्यापार्याबरोबर चर्चा केल्यानंतर या कालावधीत व्यापार्यांची उलाढाल एक लाख कोटी रुपयांनी वाढण्याचे मूल्यांकन करण्यात आले असल्याचे या संघटनेने म्हटले आहे. या संघटनेचे राष्ट्रीय महासंचालक प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, त्यामुळे केवळ धार्मिक मंगल वातावरण निर्माण होणार नाही तर आर्थिक क्षेत्रातही तेजी येण्याची शक्यता आहे.
यामुळे बरेच खरेदी विक्रीचे व्यवहार होणार आहेत. याचा अर्थव्यवस्थेला लाभ होणार आहे. ते म्हणाले की, अयोध्येतील कार्यक्रमासोबतच देशातील व्यापार्यांच्या संघटनांनी 30 हजार विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी बाजारात मिरवणूक काढण्यात येईल, पदयात्रा काढण्यात येतील, स्कूटर आणि कार रॅली काढण्यात येतील, प्रवचनांचे आयोजन केले जाणार आहे.
यासाठी संयोजकाकडून आणि जनतेकडून बर्याच प्रमाणात खर्च होणार आहे. या कार्यक्रमाच्या आणि मिरवणुकीच्या अनुषंगाने लागणार्या विविध साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे आणि विक्री वाढत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील दागिने उत्पादकांनी या कालावधीत राम मंदिराच्या प्रतिकृती आणि विविध दागिने, ग्राहकांना उपलब्ध केले असून ग्राहकाकडून अशा प्रकारच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे या कालावधीत दागिन्यांचा व्यापार वाढणार आहे. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगलोर अशा शहरांत बाजारपेठात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या शहरांमध्ये या कालावधीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होणार असल्याचे ते म्हणाले.
पाच कोटी प्रतिकृतींची होणार विक्री
राम मंदिराच्या प्रतिकृतीची म्हणजे मॉडेलची देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. पुढील दोन आठवड्याच्या कालावधीत पाच कोटी प्रतिकृतींची विक्री देशभरात केली जाणार आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले.