मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी ऐतिहासिक निर्णय देत शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवाडा केला. यावेळी नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटातील एकही आमदाराला आपत्र न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असा अंदाज वर्तवला जात होता तत्पूर्वी ठाकरेंनी ‘जनता न्यायालय’ म्हणत एक पत्रकार परिषद घेतली.या परिषदेला वकिलांची मोठी फौज देखील हजर होती. यावेळी बोलताना असीम सरोदे यांनी विविध कायदेशीर बाबी समजावून सांगत मी या ठिकाणी संविधानाच्या बाजूने बोलणार असल्याचे स्पष्ट केले.
एखाद्याची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक होते, तेव्हा त्यानं तटस्थ, निरपेक्ष व प्रामाणिकपणे वागलं पाहिजे अशी अट कायद्याला अपेक्षित आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी (नार्वेकरांनी) पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष नसल्यावर ते पुन्हा त्या पक्षात जाऊ शकतो. मात्र राहुल नार्वेकरांनी राजीनामा दिला नव्हता याची आठवण असीम सरोदे यांनी यावेळी करून दिली.
हा खटला म्हणजे काही फक्त उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा मुद्दा नाही. हा खटला म्हणजे वाईट प्रकारचं राजकारण हे असंच वाढत राहणार आहे अशी भीती देखील यावेळी सरोदे यांनी व्यक्त केली.
नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट न्यायालयात
शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध होते, तर भरत गोगावले यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे.