अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराबाबतचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर झाल्यानंतर तेथे कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वसामान्य जनजीवन नेहमीसारखे सुरळीत सुरू राहिले. भाविकांनी कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये मंदिरांमध्ये जाऊन पूजा अर्चा केली आणि संयमित प्रमाणात आनंद साजरा केला. हनुमानगढी आणि नया घाट भागात भाविकांची सकाळपासूनच वर्दळ होती.
शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून आलेलेले भाविक श्रीराम आणि हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. ठिकठिकाणी भजन आणि कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले होते. कोठेही सुरक्षा व्यवस्था कमी ठेवली गेली नव्हती. पोलिस आणि सुरक्षा रक्षकांच्या पथकांकडून ठिकठिकाणी तपासणीचे अडथळे उभारले गेले होते.
हा दिवस भक्तांनी अर्पण केलेल्या कपड्यांनी भगवान रामाची मूर्ती सुशोभित केली होती, असे राम लल्लाचे पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले. नागरिकांनी वर्तमानपत्रातील बातम्यांचे सार्वजनिक वाचन करून या निकालाचा मतितार्थही समजून घेतला. उपासनेची भांडी, पूजेच्या वस्तू, मूर्ती आणि देवी-देवतांची छायाचित्रे विकणारी दुकाने, जेवणाच्या दुकानांप्रमाणेच खुली होती. हनुमान गढी मंदिराच्या परिसरामधील मिठाईच्या दुकानांमध्ये नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. गोड मिठाई वाटून नागरिक निकालाचा आनंद साजरा करत होते. राम लल्लासाठी हार आणि फुले विक्री करणाऱ्या दुकानांनी खास वाराणसीवरून फुलांची मागणी केली होती.
अयोध्येमधील सामाजिक सौहार्दाचे वातावरण बिघडू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने नागरिकांना व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनना विशेष सतर्कतेचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी “ऍडमिन ओन्ली’चे सेटिंग केले होते. तरिही आनंद व्यक्त करणारे मेसेज व्यक्तिशः पाठवले गेले.