वाघळवाडी/सोमेश्वनगर – सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी यावर्षी रंगणार आहे. त्यात बारामतीतील “सोमेश्वर’ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हा कारखाना राष्ट्रवादीच्या ताब्यात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने हा कारखाना चालतो. या कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गजांची फौज असून पवार यांचे एक कट्टर विरोधकाने पवार यांच्याशी मनोमिलन केले आहे. ते अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यांनीही व्यूहरचना आखली असली तरी अजित पवार हे “आयाराम’, विद्यमान अध्यक्ष, इच्छुक की नवीन चेहऱ्याच्या गळ्यात अध्यक्षपदाची “माळ’ घालणार, हे पाहणे औत्स्युक्याचे आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठीच्या 2015च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. राष्ट्रवादी पॅनेलच्या विरोधात असलेल्या काकडे पॅनेलचे प्रमुख सतीश काकडे यांनाच या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला होता. सोमेश्वर कारखान्याच्या 2015च्या निवडणुकीत मतदान वाढल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण होते. त्यावेळी राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सर्व काकडे कुटुंब एकत्र आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती.
काकडे पॅनेलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या, तरी काकडेंना परभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2018मध्ये काकडे आणि पवार यांचे मनोमिलन झाल्याने दोघांमधील कटूता संपुष्टात आली अन् ते राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले.
त्यामुळे राष्ट्रवादीतील एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली होती. तर, आता कारखान्याच्या निवडणुकीत काकडे पुन्हा उभे राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अजित पवार यांचा शब्द अंतिम असल्याने जर तो काकडेंच्या विरोधात गेल्यास काकडे बंड करणार की अजित पवार यांच्या आदेशानुसार काम करणार? हे येणारा काळच स्पष्ट करेल. मात्र, तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका पार पाडावी लागणार आहे.
शेतकरी कृती समितीवर आली नामुष्की?
शेतकरी कृती समितीच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 6) तुरा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मोर्चाला सभासद व शेतकरी फिरकलेच नसल्याने हा मोर्चा रद्द करण्याची नामुष्की कृती समितीवर अल्याने कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी आत्मचिंत करण्याची गरज असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.