मेलबर्न – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरोबरी केल्यावर भारतीय संघाने टीकाकारांना आपल्या खेळातून त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. ऍडलेडची कसोटी गमावल्यावर भारतीय संघावर सातत्याने टीका होत होती.
तसेच भारतीय संघ या मालिकेत व्हाइटवॉश स्वीकारणार, असे भाकित इंग्लंडचा मायकल वॉन, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग, पाकिस्तानचा शोएब अख्तर तसेच अनेक दिग्गजांनी केले होते. मात्र, भारतीय संघाने सांघिक खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या आव्हानातील हवाच काढून टाकली व अफलातून विजय मिळवला आणि टीकाकारांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉनने ऍडलेड कसोटीनंतर भारतीय संघाचे पुनरागमन कठीण आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांचा मोठा पराभव करेल असे वक्तव्य केले होते. केवळ वॉर्न नव्हे तर, मार्क वॉ याने देखील भारताला मालिकेत परतण्याची संधी नसल्याचेही वक्तव्य केले होते. त्याने तर भारताचा मालिकेत 4-0 असा पराभव होईल, असे म्हटले होते.
ऑस्टेलियाच्या काही खेळाडूंनी विराट कोहली, महंमद शमी आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू नसल्यामुळे भारताचा पराभव होईल, अशी मते व्यक्त केली होती. पण भारतीय संघाने त्यांना चोख उत्तर दिले.