मेलबर्न – गोलंदाजांनी केलेल्या अत्यंत अचूक गोलंदाजीच्या जोरावर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासह बरोबरी करण्याची संधी मिळाली आहे. सोमवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 6 गडी गमावून 136 धावा केल्या असून ते केवळ 2 धावांनी आघाडीवर आहेत.
भारताने पहिल्या डावात 326 धावा करत 131 धावांची आघाडी घेतली होती. सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियाचे तळातील फलंदाजी किती काळ किल्ला लढवतात यावर भारताच्या विजय किती लांबेल हेदेखील स्पष्ट होणार आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात 131 धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने 112 तर, रवींद्र जडेजाने 57 धावा केल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांना आघाडी आणखी वाढवण्यात अपयश आले.
पहिल्या कसोटीत भारतीय संघाची दुसऱ्या डावात जी सुमार सुरुवात झाली होती, ती या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाची झाली. जो बर्न्सला उमेश यादवने 4 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विनने मार्नस लेबुशेनला बाद करत यजमानांची अवस्था 2 बाद 42 केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथचा जसप्रीत बुमराहने 8 धावांवर त्रिफळा उडवला. त्याच दरम्यान वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
स्मिथ बाद झाल्यानंतर कर्णधार रहाणेने रवींद्र जडेजाच्या हातात चेंडू सोपवला. त्यानेही आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना मॅथ्यू वेडला परतीचा रस्ता दाखवला. दुसरीकडे महंमद सिराजने ट्रॅव्हिस हेडला ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. हेड बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होती.
त्याचवेळी जडेजाने कर्णधार टीम पेनीला बाद करत त्यांच्यावर दडपण टाकले. त्यानंतर कॅमेरुन ग्रीन व पॅट कमिन्सने दिवसातील उर्वरित षटके खेळून काढताना संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. ग्रीन 17 तर कमिन्स 15 धावांवर खेळत असून आता त्यांच्याकडे केवळ 2 धावांची आघाडी आहे. खेळ थांबला तेव्हा त्यांच्या दुसऱ्या डावात 6 बाद 133 धावा झालेल्या आहेत. भारताकडून जडेजाने 2 गडी बाद केले. तर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद सिराज व अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी, भारतीय संघाने पहिल्या डावात 326 धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर संपवत भारतीय संघाने या सामन्यावर पहिल्या दिवसापासून वर्चस्व राखले आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचे शतक व जाडेजाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर त्रिशतकी मजल मारत पहिल्या डावात 131 धावांची भक्कम आघाडी घेतली.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 5 बाद 277 पर्यंत मजल मारलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. रवींद्र जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात एकेरी धाव घेताना दोन्ही खेळाडूंमध्ये गोंधळ झाला व रहाणे धावबाद झाला. त्याने 223 चेंडूत 12 चौकारांसह 112 धावा केल्या. त्यानंतर अश्विनला साथीला घेत जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचे तळातील फलंदाज देखील अपयशी ठरले. जडेजा बाद झाल्यावर संघाचा डाव 326 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क व नाथन लियॉन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर, पॅट कमिन्सने 2 व जोश हेजलवूडने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 195. भारत पहिला डाव – 115.1 षटकांत सर्वबाद 326 धावा. (चेतेश्वर पुजारा 17, हनुमा विहारी 21, ऋषभ पंत 29, शुभमन गिल 45, अजिंक्य रहाणे 112, रवींद्र जडेजा 57, मिशेल स्टार्क 3-78, पॅट कमिन्स 2-80, नाथन लॉयन 3-72). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 66 षटकांत 6 बाद 133 धावा. (मॅथ्यू वेड 40, मार्नस लेबुशेन 28, ट्रॅव्हिस हेड 17, कॅमेरुन ग्रीन खेळत आहे 17, पॅट कमिन्स खेळत आहे 15, रवींद्र जडेजा 2-25, जसप्रीत बुमराह 1-34, उमेश यादव 1-5, महंमद सिराज 1-23, रवीचंद्रन अश्विन 1-46).
जडेजाची अनोखी कामगिरी
जडेजाने सोमवारी खेळ सुरू झाल्यानंतर अर्धशतक पूर्ण केले. 159 चेंडूत 3 चौकारांसह 57 धावांची खेळी करत जडेजाने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात सातव्या क्रमांकावर येऊन 50 पेक्षा जास्त धावा करणारा जडेजा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात जडेजाने रहाणेला धावबाद करत मोठी चूक केली अन्यथा संघाला जास्त धावांची आघाडी घेता आली असती. अर्धशतक पूर्ण केल्यावर स्टार्कने जडेजाला बाद केले.
रहाणेची खेळी गेमचेंजर ठरेल – कोहली
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने देखील रहाणेचे कौतुक केले आहे. या सामन्यात अजिंक्यने नेतृत्वात चमक दाखवताना एक फलंदाज म्हणूनची आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्याच्या खेळीमुळेच संघातील अन्य खेळाडूंचे मनोबल वाढले व यजमानांविरुद्ध त्रिशतकी धावसंख्या उभारण्यात संघाला यश आले. आता ही संधी सोडता कामा नये, असे कोहलीने आपल्या संदेशात म्हटले आहे.
उमेश यादवलाही दुखापत
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीने सतावले आहे. या कसोटीत भक्कम स्थितीत असतानाच आता वेगवान गोलंदाज उमेश यादव यालाही दुखापत झाली आहे. इशांत शर्मा व महंमद शमी यांच्या पाठोपाठ आता उमेशही जायबंदी झाला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना उमेश यादवला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. त्यामुळे त्याला लगेचच मैदान सोडाव लागले.
दुसऱ्या डावातील आठवे षटक टाकत असताना उमेशला हॅमस्ट्रिंगमुळे मैदान सोडवे लागले व त्याचे उर्वरित षटक महंमद सिराजने पूर्ण केले. उमेशची दुखापत कितपत गंभीर आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण ईशांत शर्मा आणि शमी यांच्यानंतर उमेश यादवही दुखापतग्रस्त झाला आहे. सध्या सर्व गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराहवर आली आहे.