-अमित डोंगरे
भारतीय संघाने अपेक्षेनुसार यजमान ऑस्ट्रेलियावर दडपण टाकले. यजमानांची प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध मीडिया स्ट्रॅटेजी आणि माइंड गेम त्यांच्यावरच उलटवण्यात कर्णधार अजिंक्य रहाणेचा संघ यशस्वी ठरला.
अॅडलेड कसोटीत पानिपत झाल्यानंतर भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करूच शकणार नाही, अशा लंब्याचवड्या बाता मारण्याचे उद्योग ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी केला होता. भारतीय गोलंदाजांनी त्यांचेच दात त्यांच्याच घशात घातले याचा सर्वात जास्त आनंद वाटतो. पहिल्या डावात यजमान संघाला दोनशेच्या आत गुंडाळल्यावर फलंदाजांनीही जबाबदारी दाखवली.
अर्थात प्रमुख फलंदाजांना जरी अपयश आले तरीही कर्णधार रहाणे याने रवींद्र जडेजाच्या साथील अॅडलेडची पुनरावृत्ती होऊ दिली नाही उलट 131 धावांची बहुमोल आघाडी संघाला मिळवून दिली. या दोघांची भागीदारीच या सामन्यात भारतीय संघाला ड्रायव्हर सीटवर बसवण्यात मोलाची ठरली.
या मालिकेत आपण प्रथमच त्रिशतकी धावांचा पल्ला पार केला. रहाणेचे शतक या डावाचा कळसाध्याय ठरले. अर्थात जडेजाने दिलेल्या साथीलाही सलाम केला पाहिजे. मोस्ट अंडररेटेड प्लेअर असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्याच रहाणे व जडेजा यांनी टीकाकारांना तसेच संजय मांजरेकर यांच्यासारखे खोचक टीका करणाऱ्यांना आपल्या खेळातूनच जबरदस्त उत्तर दिले.
यजमानांवरच कुरघोडी केल्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या गोलंदाजांनी यजमान संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. जो बर्न्स, स्टिव्ह स्मिथ व कर्णधार टीम पेनी यांना भारतीय गोलंदाजी झेपलीच नाही. मॅथ्यू वेड व मार्नस लेबुशेन यांनी प्रतिकार केला पण तोपर्यंत भारतीय गोलंदाजी कांगारूंच्या डोक्यावर बसली होती.
जसप्रीत बुमराहने ज्या चेंडूवर स्मिथचा त्रिफळा उडवला तो चेंडू बुमराह आयुष्यभर डोक्यावर घेऊन फिरेल. या सामन्यात फलंदाजी करून संघाला हात देणारा जडेजा गोलंदाजीतही स्टार ठरला. त्याने वेड आणि पेनी यांना चक्क मामा बनवले. उमेश यादवनेही पहिला स्पेल स्वप्नवत टाकला व बर्नला तंबूत पाठवले मात्र, त्याचवेळी त्यालाही दुखापत झाली व मैदान सोडावे लागले. हे दुखापतींचे शुक्लकाष्ट आता यजमान संघाबरोबरच भारताच्याही पाठीमागे लागले आहे.
इशांत शर्मा व महंमद शमी यांच्या पाठोपाठ यादवही जायबंदी झाल्याने उर्वरित दोन कसोटीत बुमराह, सिराज यांनाच मुख्य भार वाहावा लागणार आहे. पहिल्या व या कसोटीतून सिराज हा नवा स्टार वेगवान गोलंदाज भारताच्या कसोटी संघाला मिळाला. त्याची गोलंदाजी काहीशी फसवी आहे. त्याचा रिलीज पाहिला तर त्याच्याकडे मोठा बाऊन्स आहे यावर विश्वासच बसत नाही.
ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज यजमानांनाच बाऊन्सरवर त्रस्त करत असल्याचे दुर्मिळ चित्र या मालिकेत दिसून येत आहे. यापूर्वी भारताचे वेगवान गोलंदाज म्हणजे चेंडूची चमक घालवण्यापुरतेच आसायचे कारण त्यानंतर दिवसातील जवळपास 55 ते 60 षटके फिरकी गोलंदाजाच टाकायचे. तीच आपली ताकद होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चित्र बदलले आहे.
आपले फलंदाज जसे वर्चस्व गाजवताना दिसतात तसेच आता गोलंदाजही प्रतिस्पर्धी संघाचा पालापाचोळा करताना दिसत आहेत. आता फक्त यजमानांचे शेपूट फार वळवळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही संघाविरुद्ध सामना असला की पहिले पाच-सहा फलंदाज लवकर बाद झाले तरी त्यांचे शेपूट आपल्याला त्रास देते हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे बुमराह, सिराज, जडेजा व अश्विन यांनी या सामन्यात यजमानांचे शेपूट फार वळवळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तरच या कसोटीत विजय तर मिळेलच पण मालिकेत बरोबरी करून यजमानांवरच डाव उलटवता येईल.