मेलबर्न – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरी गाठलेल्या भारतीय संघाला आता विश्ववितेजेपद केवळ एक पाऊल लांब आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत जागतिक विजेते बनून इतिहास घडविण्याची संधी भारतीय महिला संघाला मिळालेली आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडशी होणार होता. मात्र, संततधार पावसाने पूर्ण सामनाच रद्द झाला होता. त्यात साखळीतील सर्व सामने जिंकल्याने भारतीय संघाची गुणसंख्या इंग्लंडपेक्षा अव्वल ठरल्याने भारताला पुढे चाल मिळाली.
विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी या स्पर्धेत उतरलेल्या भारतीय संघाने सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचाच पराभव केला होता, त्यामुळे पुन्हा त्यांच्याशीच अंतिम लढत होणार असल्याने भारतीय संघालाच संभाव्य विजेते मानले जात आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची प्रमुख गोलंदाज मेगन श्कट भारतीय फलंदाजीसमोर गोलंदाजी करण्यासाठी घाबरली आहे. तिने एका मुलाखतीत तिच्यावरील दडपण व्यक्त केले. भारतीय संघातील शफाली वर्मा व अनुभवी फलंदाज स्मृती मानधना यांना गोलंदाजी करण्याचे प्रचंड दडपण आल्याचे मेगनने सांगितले.