कोहलीसह प्रमुख फलंदाज अपयशी
सिडनी – अष्टपैलू हार्दिक पंड्या व सलामीवीर शिखर धवन यांच्या दमदार खेळीनंतरही प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 66 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. स्टिव स्मिथ सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी 375 धावांचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत 8 बाद 308 पर्यंतच मजल मारता आली आणि भारताला पहिला सामना 66 धावांनी गमवावा लागला. भारताक़डून हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यांनी दमदार खेळी केली पण इतर प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. हार्दिक पंड्याने 76 चेंडूत (7 चौकार व 4 षटकार) 90 तर शिखर धवनने 86 चेंडूत (10 चौकार ) 74 धावा केल्या. याशिवाय विराट कोहलीने 21(21), मयंक अग्रवालने 22(18), श्रेयस अय्यरने 2(2), लोकेश राहुलने 12(15), रविंद्र जडेजा 25(37) आणि नवदीप सैनीने नाबाद 29(35) धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत अॅडम झम्पाने 10 षटकांत 54 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. जोश हेझलवूडने 10 षटकात 55 धावा देत 3 तर मिशेल स्टार्कने 9 षटकांत 65 धावा देत 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. डेव्हिड वाॅर्नर आणि अॅरोन फिंच यांनी चांगली सुरूवात करताना पहिल्या विकेटसाठी 156 धावा जोडल्या. वाॅर्नरने 69(76) तर फिंचने 114(124) धावांची खेळी केली. त्यानंतर स्टीव स्मिथने धडाकेबाज खेळी करत जलद शतक पूर्ण केले. त्याने 66 चेडूंत (11 चौकार आणि 4 षटकार) 105 धावा केल्या तर ग्लेन मॅक्सवेलने 19 चेंडूत 45 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने 10 षटकात 59 धावा देत 3 गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. चहलन सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकात 89 धावा दिल्या.