दुबई – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही पराभव केला. त्यामुळे आता त्यांचे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील स्थानच धोक्यात आले आहे. त्यांना जर अंतिम फेरी गाठायची असेल तर उर्वरित दोन कसोटी सामने जिंकणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंकेने न्यूझीलंडचा कसोटी मालिकेत किमान 1-0 असा पराभव केला पाहिजे. याच जर-तरच्या समीकरणावर ऑस्ट्रेलियाचे स्थान निश्चित होणार आहे.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली ही मालिका कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाच भाग आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी पहिल्या स्थानावर होता. मात्र, सलग दोन सामने गमावल्यामुळे आता तेच अंतिम फेरी गाठतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धचे उर्वरित दोन्ही कसोटी सामने हरला तर ते अंतिम फेरीतील स्थान गमावणार आहेत.
या दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचे 16 कसोटीत 70.83 टक्के गुण होते. त्यांनी 10 सामने जिंकले होते, तर दोन गमावले होते. हा त्यांचा तिसरा पराभव आहे. आता त्यांचे 66.67 टक्के गुण आहेत. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे 61.67 टक्के गुण होते. विजयानंतर त्यांच्या गुणात आणखी बारा टक्के वाढ झाली. आता भारताचे 64.06 टक्के गुण आहेत. भारताने आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत. त्यांचा हा 10 वा विजय आहे, तर 4 सामने त्यांनी गमावले आहेत.
#INDvAUS 2ND Test : जडेजा-अश्विनसमोर ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; दुसऱ्या कसोटीत भारताचा दमदार विजय
ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला तर त्यांचे 59.65 टक्के गुण होतील. श्रीलंकेचे 53.33 टक्के गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. श्रीलंकेने या मालिकेतील दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 61.11 टक्के गुण होतील व ते अंतिम फेरीत स्थान मिळवतील व ऑस्ट्रेलियाला बाहेर पडावे लागेल. भारताचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.