पारनेर – पारनेर तालुक्यातील धोत्रे फाटा येथे बस आणि कारच्या अपघातात अकोले तालुक्यातील नाचणठाव येथील कन्या शाळेचे मुख्याध्यापक व एक शिक्षक जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला. या अपघातात मुख्याध्यापक मिलिंद नामदेव बर्वे (वय 50, रा. कोतुळ, ता. अकोले) व ईश्वरचंद्र पोखरकर (रा. कोतुळ) अशा दोघांचा जागीच मृत्यु झाला. तर अविनाश पवार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही तिघे शैक्षणिक कामानिमित्त नगर येथे गेले असता काम आटोपल्यानंतर माघारी परतत असताना हा अपघात घडला. घटनेनंतर दोघांना टाकळी ढोकेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, तोवर उशीर झाला होता. तेथेच डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. ही घटना अकोले तालुक्यात समजली असता सर्वांना सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली.
एकाच तालुक्यातील आणि एकाच मार्गाने जायचे असल्यामुळे बर्वे, पोखरकर आणि पवार यांनी कारने परतीचा प्रवास सुरू केला. खरंतर अकोले तालुका आणि नगर हे अंतर फार असल्यामुळे आणि त्यात रस्ता खराब असल्याने त्यांनी पारनेरमार्गे अकोले जवळ करण्याचा प्रयत्न केला. धोत्रे फाट्यावर असताना अचानक समोरुन बस आली. बस आणि कार यांच्या अपघातात काही क्षणात होत्याचे नव्हते होऊन गेले. बस चालकाच्या बाजुने कार धडकली आणि कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
मिलिंद बर्वे हे नाचनठाव माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शैक्षणिक कामानिमित्त ते सकाळीच त्यांच्या (एम. एच 17 एझेड 3491) या गाडीने नगरकडे निघाले होते. जाताना गाडीत फक्त बर्वे आणि त्यांच्या शाळेतील क्लार्क अविनाश पवार असे दोघेच होते. त्यांचा नगरपर्यंतचा प्रवास हा सुखकर झाला होता. तेथे गेल्यानंतर त्यांनी आपली कामे तत्काळ पार पाडली. लांबचा प्रवास असल्यामुळे दुपारी 2 वाजेच्या दरम्यान ते माघारी निघणार तोच यांना ईश्वरचंद्र पोखरकर यांची भेट झाली. पोखरकर हे देखील अकोले तालुक्यातील कळंब येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.त्यामुळे, त्यांना देखील नगरहून अकोल्याला यायचे होते.
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिघांना टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात दाखल केले होते. पारनेर तालुक्यातील काही व्यक्तींनी संबंधित गाडीचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. दोघे शिक्षक अकोले तालुक्याचे असून त्यांचा मृत्यु झाल्याची बातमी काही क्षणात अकोले तालुक्यात सोशल मीडियातील वाऱ्यासारखी पसरली आणि दोघांचे ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बर्वे हे आंबेडकरी चळवळीतील फार चांगले नाव होते. त्यामुळे, अनेकांनी त्यांच्याबाबत आश्रू ढाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.