कराड – अवकाळी व अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या कराड तालुक्यातील पिकांची पाहणी डॉ. अतुल भोसले यांनी नुकतीच केली. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याने शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन डॉ. अतुल भोसले यांनी दिले.
डॉ. अतुल भोसले यांनी शेरे, ता. कराड येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नितीन गावडे या शेतकऱ्याच्या ऊस पिकांतर्गत घेतलेल्या सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पं. स. सदस्य बाळासाहेब निकम, नितीन गावडे, उपसरपंच पांडुरंग निकम, शंकर निकम, बाळासाहेब निकम, श्रीरंग पवार, दिनकर निकम, अधिकराव निकम, सतीश निकम व शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, शासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार तालुक्यातील नुकसानीची पंचनामे तातडीने पूर्ण करुन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त झालेल्या अवकाळी पावसाचा राज्याला तडाखा बसला. यात कराड तालुक्यातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, भात आदी काढणीला आलेली पिके वाया गेली आहेत. सोयाबीन पूर्णपणे कुजून काळा पडला आहे. तर भुईमूग व हायब्रीड शेतातच उगवले आहे. भाताचेही मोठे नुकसान झाले आहे.