– हेमंत महाजन
यंदाच्या निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चीन हस्तक्षेप करू शकतो, असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. यंदा जगभरातील किमान 64 देशांमध्ये राष्ट्रीय निवडणुका होणार आहेत.
चीन सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘एआय’द्वारे तयार केलेल्या सामग्रीचा वापर करून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. ‘स्टॉर्म-1376’ या नावाने ओळखल्या जाणार्या गटाकडून तैवानच्या निवडणुकांमध्ये ‘एआय’च्या मदतीने बनवलेले बनावट ऑडिओ सपोर्ट आणि मीम्स आदी सामग्री प्रसारित केली गेली. काही उमेदवारांची बदनामी करणे आणि मतदारांच्या धारणा प्रभावित करणे, हा त्या मागचा उद्देश होता. फेब्रुवारी 2023 पासून ‘स्टॉर्म-1376’ने ‘एआय’ टीव्ही न्यूज अँकर तैनात केले, ज्यांनी दुष्प्रचार करण्याचा वेग वाढवला.
तैवान निवडणुकीत चीन यशस्वी?
तैवानच्या निवडणुकीत चीनने केलेल्या ढवळाढवळीला किती यश मिळाले? मायक्रोसॉफ्टच्या अहवालानुसार, चीनला निवडणुकीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. तरीही, या हस्तक्षेपाचा निवडणुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला, असे मानले जाते. चीनद्वारे तैवान निवडणुकीमध्ये हस्तक्षेप भारतासाठी एक अभ्यासाचा विषय आहे, ज्यापासून आपण खूप काही शिकू शकतो.
यूएस निवडणुकीत ‘एआय’ वापर
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा चीनने अमेरिकन निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केलेला आहे. ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीसुद्धा अशाच प्रकारचा आरोप चीनच्या विरोधात केला आहे.
चिनी गट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फायदा घेत समाजात फूट पाडणारे प्रश्न निर्माण करतात आणि मतदारांच्या मानसिकतेविषयी गुप्त माहिती गोळा करतात आणि नंतर त्या त्या भागाला/समाजाला अनुरूप असा दुष्प्रचार करतात. अलीकडच्या काही महिन्यांत चीनने नोव्हेंबर 2023 मध्ये केंटकीमध्ये ट्रेन रुळावरून घसरणे, ऑगस्ट 2023 मधील माऊ जंगलात लागलेली आग, यासह अनेक विषयांवर यूएस आणि इतरत्र प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच इमिग्रेशन धोरणे आणि देशातील वांशिक तणाव असे अनेक विषय पुढे आणून मतदारात फूट पाडून, चिनी समर्थक उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यास सांगण्यात आले. या प्रयत्नांना थोडे यश मिळाले आहे. म्हणजे तंत्रज्ञानाची महाशक्ती असलेल्या अमेरिका आणि तैवानसारख्या देशांमध्येसुद्धा चीनने ‘एआय’चा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्यात, काही प्रमाणात यश मिळवले. चीनची ताकद एवढी मोठी असेल, तर भारताला नक्कीच सावध राहावे लागेल. भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या देशांमध्ये यंदा होणार्या निवडणुकांमध्ये चिनी ‘एआय’चा वापर होऊ शकतो.
‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून फसव्या आणि खोट्या सामग्रीच्या निर्मितीसाठी राजकीय जाहिरातींद्वारे उद्भवलेला धोका, ज्यामध्ये डीपफेक किंवा कधीही न घडलेल्या घटनांचा समावेश आहे. उमेदवारांनी न केलेली विधाने, विविध मुद्द्यांवरील त्यांच्या भूमिका आणि काही घटनांच्या सत्यतेबाबत जनतेची दिशाभूल करणे हा डावपेचाचा उद्देश आहे. यामुळे मतदारांच्या मनावर परिणाम होतो. एआय-व्युत्पन्न सामग्रीचा प्रभाव, कालांतराने अधिक प्रभावी होऊ शकतो.
भारताच्या सार्वत्रिक निवडणुका 19 एप्रिल रोजी सुरू होणार आहेत, ज्यांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सात टप्प्यांत होईल. निवडणूक आयोगाने चुकीची माहिती त्वरित ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी आधीच मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉल जाहीर केले आहेत. भारताच्या निवडणुकात चीनची ढवळाढवळ थांबवण्याकरता भारताने नेमकी अजून कुठली पावले उचलली पाहिजे?
मतदारांमध्ये गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण करणे. विशिष्ट उमेदवारांसाठी किंवा विरोधात मतदान करण्यासाठी मतदारांना प्रभावित करणे. चीन भारताच्या निवडणुकांमध्येही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतो, हे नाकारता येत नाही. या धोक्यापासून बचाव करण्यासाठी भारताने खालील पावले उचलणे आवश्यक आहे.
सोशल मीडियावर लक्ष ठेवणे : बनावट बातम्या, चुकीची माहिती पसरवण्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसोबत काम केले पाहिजे.
नागरिकांना डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देणे : मतदारांना बनावट बातम्या आणि चुकीची माहिती ओळखण्यास आणि त्यापासून दूर राहण्यास मदत करण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवणे आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना बनावट बातम्या आणि प्रचार ओळखण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास मदत होईल.
सायबर सुरक्षा मजबूत करणे : सरकार निवडणूक आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) आणि इतर निवडणूक संबंधित प्रणालींची सुरक्षा मजबूत करत आहे. निवडणूक प्रक्रियेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सरकारने सायबर सुरक्षा उपाययोजना अजून मजबूत केल्या पाहिजेत.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता : निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष आहे याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. यामुळे मतदारांना निवडणुकीवर विश्वास वाढण्यास मदत होईल आणि हस्तक्षेपाची शक्यता कमी होईल.
निवडणूक कायद्यांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई : यामुळे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणार्यांना वचक बसेल.
आंतरराष्ट्रीय सहकार्य : चीनकडून होणार्या निवडणुकीतील हस्तक्षेपाला प्रतिबंध करण्यासाठी इतर देशांशी सहकार्य करणे आवश्यक आहे. भारताने चीनच्या हस्तक्षेपाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाला माहिती देणे आवश्यक आहे. चीनच्या हस्तक्षेपाचा सामना करण्यासाठी इतर देशांसोबत काम करणे आवश्यक आहे.
राजकीय पक्षांनी निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर करताना अधिक पारदर्शक आणि जबाबदार असणे आवश्यक आहे.नागरिकांनी सोशल मीडियावर पाहिलेली माहिती तपासून आणि पुष्टी करूनच शेअर केली पाहिजे. चीनच्या हस्तक्षेपाचा धोका गंभीर आहे आणि भारताने त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्वरित आणि प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे.
सरकार, राजकीय पक्ष आणि नागरिक या सर्वांनी यामध्ये योगदान देणे आवश्यक आहे. भारताने चीनच्या हस्तक्षेपाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, ज्यामुळे लोक बनावट बातम्या आणि प्रचारापासून सावध राहू शकतिल.