वडगाव मावळ – प्रहार संघटनेने 2013 मध्ये आमदार आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको केला होता. या न्यायालयीन खटल्याच्या अंतिम सुनावणीसाठी त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रहार संघटनेच्या वतीने अपंगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 4 फेब्रुवारी 2013 रोजी देहू ते मुंबई असा मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान, देहूरोड येथील सेंट्रल चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला होता.
आमदार कडू यांच्यासह प्रहार संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख सुहास गोलांडे, माऊली काळोखे, रशीद धोंडफोडे, जालिंदर कालोखे, सागर गायकवाड, विशाल गोलांडे, श्रीकांत मोरे, बालाजी गोलांडे, सागर पाटील, कैलास काळोखे आदींचा त्यात समावेश आहे. त्याचा खटला वडगाव न्यायालयात सुरू असून, ऍड. राजेंद्र गाडे-पाटील त्यांचे न्यायालयीन काम पहात आहेत.
गुरुवारी अंतिम सुनावणीसाठी आमदार कडू व त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात हजेरी लावली. यावेळी सर्वांचे जाब जबाब नोंदवून घेण्यात आले. सुमारे साडेतीन तास आमदार कडू वडगावमध्ये होते. त्यांनी तहसीलदार कार्यालय व मावळ पंचायत समितीलाही धावती भेट दिली. दरम्यान, अपंगांसाठी पुकारलेल्या लढ्यामुळेच व केलेल्या आंदोलनांमुळेच राज्य शासनाने दिव्यांगांसाठी वेगळे दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. पहिली दिवाळी आहे की अपंग बांधवांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती आमदार कडू व गोलांडे यांनी दिली.
जनरल मोटर्सच्या कामगारांना दिला पाठींबा
दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून येथे साखळी उपोषण करणाऱ्या जनरल मोटर्स कामगारांची आमदार कडू यांनी भेट घेऊन, त्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.