Bhupesh Baghel – राजभवनच्या अर्थात राज्यपालांच्या माध्यमातून भाजप विरोधी पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ती बाब देशाच्या आणि लोकशाहीच्या हिताची नाही, असे टीकास्त्र छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपेश बघेल यांनी सोडले.
विविध राज्यांच्या सरकारांकडून राज्यपालांवर विधेयकांची मंजुरी रखडवल्याचे आरोप होत आहेत. त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि तामीळनाडूच्या राज्यपालांसंदर्भात नुकतीच कठोर टिप्पणी केली. त्याविषयी बघेल यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
राजभवनकडून अधिकारांच्या गैरवापराचे प्रयत्न होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भाजपेतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांत तेथील सरकारे आणि राज्यपालांमध्ये विविध मुद्द्यांवरून सातत्याने संघर्ष होताना दिसतो. संबंधित राज्यांमधील राजकारण तापण्यास तो संघर्षही कारणीभूत ठरत आहे.
आता तो संघर्ष थेट न्यायालयात पोहचला आहे. त्याच्याशी निगडीत पंजाब आणि तामीळनाडूतील प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने केलेली टिप्पणी अतिशय गंभीर असल्याचे बघेल यांनी म्हटले.