नागठाणे – टोळेवाडीच्या गावठाण पुनवर्सनासाठी शासन स्तरावरुन लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. टोळेवाडी (भैरवगड, ता. सातारा) या भूस्खलनामुळे बाधित झालेल्या गावास रावते यांनी भेट दिली. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, पुरुषोत्तम जाधव त्यांच्यासोबत होते.
टोळेवाडीतील घरांची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे येथील लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांचे तात्पुरते पुनर्वसन त्वरीत होणे आवश्यक आहे. त्यानंतर घरांची अवस्था पाहून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तोही लवकरात लवकर सोडविला जाईल, असेही रावते यांनी नमूद केले. जमिनीचे पंचनामे तसेच घरांबाबत जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्याबरोबर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नागठाण्यातील नंदकुमार नलवडे, सामाजिक कार्यकर्ते मधुअण्णा खुळे, शंकर साळुंखे तसेच भैरवगड ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, पंचायत समिती सदस्या विजया गुरव, लखन साळुंखे, इंद्रजित ताटे, युवराज साळुंखे, सतीश गोरे, शंकर साळुंखे यांनीही टोळेवाडीस भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली. मदतकार्याचा आढावा घेतला.